
रत्नागिरी-अपिलात सातजणांची निर्दोष मुक्तता
सातजणांची अपिलात निर्दोष मुक्तता
रत्नागिरी, ता. ५ ः रत्नागिरी पालिकेच्या पोटनिवडणुकीत विनापरवाना मिरवणूक काढल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या शिक्षेविरोधात केलेले अपिल अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंजूर करत सातजणांची निर्दोष मुक्तता केली आणि दंडाची रक्कम परत करण्याचे आदेश दिले.
रत्नागिरी पालिकेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळाल्याबद्दल ३ नोव्हेंबर २०१५ ला सायंकाळी राजिवडा भागात मिरवणूक काढण्यात आली होती. रूबिना मालवणकर व सईद पावसकर हे विजयी उमेदवार ओपन जीपमध्ये या मिरवणुकीत सहभागी झाले होते. रस्त्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने मिरवणूक काढल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ माने यांनी तक्रार दिली होती. या प्रकरणी एकूण १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. या विरोधात रूबिना मालवणकर, सईद पावसकर, शब्बीर भाटकर, सैफअली पावसकर, नीलेश भोसले, स्वप्नील शिंदे, सुरज गेहलोत यांनी सत्र न्यायालयात अपिल दाखल केले होते. सातजणांच्यावतीने अॅड. सचिन थरवळ यांनी बाजू मांडली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ला. द. बिले यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेली शिक्षा रद्द करताना त्यांना निर्दोष मुक्त केले आणि दंडाची रक्कम परत करण्याचे आदेश दिले.