
केरळच्या धर्तीवर रत्नागिरीत हाऊसबोटिंग प्रकल्प
३ (पान ६ साठी, मेन)
- rat६p११.jpg-
२३M००९५०
रत्नागिरी- हाऊसबोट
केरळ धर्तीवर रत्नागिरीत हाऊसबोटिंग प्रकल्प
जिल्हा परिषद सीईओंची संकल्पना; जलपर्यटनाला नवी दिशा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः केरळच्या धर्तीवर जिल्ह्यात लवकरच खाड्यांमध्ये हाऊसबोटिंगचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. पर्यटनवाढीच्यादृष्टीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प पुढे आला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून काही बचतगट एकत्र आणून हाऊसबोटिंगच्या माध्यमातून पर्यटनवृद्धीला चालना देण्याचा हा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने लवकरच एक टीम केरळचा दौरा करणार आहे.
जलपर्यटनाला दिवसेंदवस वाढती पसंती आहे. अनेक पर्यटकांना समुद्राच्या निळाशार पाण्याची आणि समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन प्रवास करण्याची भुरळ आहे. म्हणूनच मुंबई, रायगडमध्ये, दाभोळ येथील फेरीबोटीला चांगला प्रतिसाद मिळतो. मोठमोठ्या आलिशान क्रूझ सुरू होणार आहेत. त्यातून मुंबई-गोवा जलप्रवास करता येणार आहे. कर्ला (ता. रत्नागिरी) येथे खाडीच्या पाण्यामध्ये बोटिंग सुरू आहे. दोन किंवा चार कुटुंबे एकत्र येऊन विरंगुळा म्हणून पाण्यातील सफरीचा आनंद लुटतात. त्यासाठी कॅटरनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हाऊसबोटिंगचा आनंद लुटला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक खाड्या आहेत. या खाड्यांमध्ये हा केरळच्या धर्तीवर हाऊसबोटिंग सुरू करता येऊ शकते, असा विचार सीईओ कीर्तीकुमार पुजार यांच्या मनात आला. त्यांनी यावर विचार करून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी कोट्यवधीचा निधी येतो. काही महिला बचतगट एकत्र आणून सुमारे अर्धा कोटी किंवा पाऊण कोटीची एखादी हाऊसबोट बांधून जलपर्यटनाला नवा आयाम देण्याचा विचार केला आहे. याबाबत संबंधित यंत्रणांशी चर्चा करून त्याला कसे अर्थसाहाय्य मिळेल, याबाबत चर्चा झाली आहे. त्या अनुषंगाने १२ जणांची एक टीम तयार करून केरळ दौरा केला जणार आहे. या दौऱ्यानंतर हाऊसबोटिंग प्रकल्पाला दिशा मिळणार आहे.
---
कोट
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी खाड्या आहेत. या खाड्यांच्या संथ पाण्यामध्ये केरळच्या धर्तीवर हाऊसबोटिंग सुरू करता येईल. रेस्टॉरंट, सुंदर राहण्याची व्यवस्था, छोटे गार्डन आदी सुविधा असतील अशी हाऊसबोट बांधण्याची संकल्पना आहे. त्यासाठी आम्ही १२ जणांचा केरळ दौरा करणार आहे. त्यानंतर या प्रकल्पाला मुहूर्तस्वरूप येणार आहे
- कीर्तीकुमार पुजार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी