तिवरे धरणफुटी प्रकरणी ''महसूल'' दोषमुक्त

तिवरे धरणफुटी प्रकरणी ''महसूल'' दोषमुक्त

तिवरे धरणफुटीत ‘महसूल’ दोषमुक्त
कारवाई करू नये असा अहवाल; साळुंखे यांचा गौप्यस्फोट
चिपळूण, ता. ६ः संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या तिवरे धरणफुटी प्रकरणातील दोषींना जिल्हा प्रशासनाकडून पाठीशी घातले जात असल्याचा आरोप माहिती अधिकारी कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी केला आहे. या दुर्घटनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांना दोषमुक्त केले असून त्यांच्यावर कारवाई करू नये, असा अहवाल शासनाला पाठवला आहे, असा गौप्यस्फोट साळुंखे यांनी केला आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आल्याचे त्यानी सांगितले.
तिवरे धरणफुटीप्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे संबंधित विभाग, प्रशासन व शासनस्तरावर पाठपुरावा करत आहेत. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देऊनही कारवाई न झाल्याने साळुंखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे माहिती अधिकारात माहिती मागविली होती. त्यातून माहिती समोर आली ती धक्कादायक असल्याचे सांगत साळुंखे यांनी जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण २ जुलै २०१९ ला फुटले. त्यामध्ये झालेल्या जीवित व वित्तहानीप्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक स्थापन केले होते. या पथकामध्ये डॉ. दिलीप पांढरपट्टे, सचिव तथा महासंचालक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय-अध्यक्ष, सुनील कुशीरे, अप्पर आयुक्त, जलसंधारण पुणे-सदस्य, हनुमंत विठ्ठलराव गुनाले, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ, सांगली तथा प्रभारी मुख्य अभियंता जलसंपदा पुणे-सदस्य यांची निवड करून अहवाल शासनास सादर करण्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी शासनास अहवाल सादर केला होता. त्यामध्ये धरणाची प्रथम गळती निदर्शनास आल्यापासून धरणफुटीची घटना घडेपर्यंत देखभाल व दुरुस्ती वरिष्ठ स्तरावर उपाययोजनेबाबत अवगत न करणे, धरणाच्या खालील बाजूस असणारी लोकवस्ती न हटवणे, पावसाळापूर्व व पावसाळ्यानंतरची तपासणी करण्यासाठी जबाबदार शाखा अभियंता/उपविभागीय अभियंता, संबंधित कार्यकारी अभियंता यांची तसेच महसूल विभागातील जबाबदार अधिकारी/कर्मचारी यांची विभागीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, असे नमूद होते.
त्या अहवालानुसार सहाय्यक मुख्य अभियंता मृद व जलसंधारण ,प्रादेशिक क्षेत्र, पुणे यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना पत्र पाठवून महसूल विभागातील जबाबदार अधिकारी/कर्मचारी यांची विभागीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, असे नमूद केले होते.त्यानंतर कारवाई करण्यास विलंब होत असल्यामुळे विद्याधर साळुंखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकारात महसूलमधील अधिकारी/कर्मचारीवर्गावर केलेल्या कारवाईच्या प्रतीची मागणी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालय यांनी महसूल विभागातील दोषी लोकांना दोषमुक्त करून त्यांच्यावर कारवाई करू नये, असे शासनास अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आता विशेष चौकशी पथकाने सादर केलेल्या अहवालावर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

चौकट
ग्रामस्थांनी अपेक्षा सोडली...
ज्या जबाबदार अधिकारीवर्गाच्या हलगर्जीमुळे ग्रामस्थांची जीवितहानी आणि वित्तहानी झाली त्या दोषी अधिकारीवर्गावर कारवाई होईल, अशी अपेक्षा आता ग्रामस्थांनाही राहिली नाही, अशी खंतही माहिती अधिकारी कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com