
गाळमुक्त धरण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
गाळमुक्त धरण योजनेचा
लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, ता. ९ ः महाराष्ट्रामध्ये ६ मे २०१७ पासून मार्च २०२१ अखेरपर्यंत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभागाने ही योजना पुन्हा सुरू केली आहे. मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा जलसंधारण अधिकारी सु. भा. गायकवाड यांनी ही माहिती दिली.
श्री. गायकवाड म्हणाले की, या योजनेंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्थांना यंत्रसामग्री आणि इंधन या दोन्हींचा खर्च देणे प्रस्तावित आहे. अल्प व अत्यल्पभूधारक, विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. अशासकीय संस्थांना गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री आणि इंधनासाठी ३१ रुपये प्रति घनमीटर व पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी ३५.७५ रुपये प्रति घनमीटरप्रमाणे एकरी १५,००० रुपयेच्या मर्यादा व २.५ एकर (३७,५०० रुपयांपर्यंत) अनुदान दिले जाणार आहे. मृद व जलसंधारण रत्नागिरी विभागाच्या अखत्यारित रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे येत असून अभियानामध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अशासकीय संस्थांनी तालुकानिहाय संबंधित उपअभियंत्यांशी संपर्क करून मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या जलसाठ्यांची माहिती घ्यावी. संबंधित ग्रामपंचायतीच्या ठरावासोबत सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, रत्नागिरी, सिंचन भवन, कुवारबाव, रत्नागिरी येथे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन केले आहे. प्रस्तावात जलसाठ्यातील अंदाजे उपलब्ध गाळाच्या प्रमाणाचा उल्लेख असणे बंधनकारक आहे.