बदलत्या वातावरणचा भाजीपाल्याला फटका
बदलत्या वातावरणचा भाजीपाल्याला फटका
पेण, ता. ९ : तापमानातील वाढ त्यात अवकाळी पावसामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर कडाडले असून फरसबी, आल्याच्या किमती २०० रुपये किलो झाल्या आहेत, यामुळे बाजारहाट करताना सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.
गेल्या महिन्यात भाज्यांचे भाव आवाक्यात होते, त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला होता. भाज्यांची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या मुंबई वाशी, पुणे, नाशिक येथेच भाव वाढल्याने पेणच्या बाजारपेठेत येणाऱ्या भाज्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. बाजारपेठेत आठ दहा दिवसांपूर्वी मटर, गवार, फ्लावर, वांगी, भेंडी, घेवडा, कारली, टोमॅटो, शिराला या भाज्यांच्या किमती साधारणपणे ६० ते ८० रुपये किलो होत्या, मात्र तापमान वाढीचा फटका बसल्याने बहुतांश भाज्यांनी शंभरी गाठली आहे. त्यामुळे रोजच्या जेवणाचा ताळमेळ बसवताना गृहिणींना चांगलीच कसरत करावी लागते. भाज्यांचे दर वाढल्याने अगोटीत केलेले पदार्थ्यांचा जेवणात समावेश वाढला आहे. दरम्यान, कडक उन्हामुळे भाज्यांचे उत्पादन घटते. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने भाज्यांची दरवाढ झाली आहे. भाव वाढल्याने जेवणातून कोथिंबीर गायब झाली आहे. घाऊक बाजारात फरसबी, आलं, कोथिंबीर महागली असून फरसबी प्रतिकिलो ६० ते १२० रुपयांवर, तर आलं १३५ रुपयांवर गेले आहे.
--
कोट
वातावरणात कमालीचा बदल होत असल्याने मुंबई किंवा पुण्यावरून येणाऱ्या भाज्यांच्या किंमती खूप वाढल्या आहेत; पेण बाजारपेठेत येणाऱ्या मुंबईच्या वाशी, पुणे एपीएमसीतील भाज्यांचे दर वाढले असून फरसबी, आल्यासह मटार, घेवड्याने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे ग्राहकांची संख्याही रोडावली आहे.
- सिरताज खान, भाजी विक्रेते,
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.