
शासन आपल्या दारी योजनेतून 75 हजार दाखल्यांचे वाटप
पान ३ साठी
जिल्ह्यात ७५ हजार दाखल्यांचे वाटप
उदय सामंत ; शासन आपल्या दारी योजनेतून गावात दाखले, आरोग्यसेवा
रत्नागिरी, ता. १० ः शासन आपल्या दारी ही नवी योजना १३ मे पासून सुरू होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले सुमारे ७५ हजार विविध दाखल्यांचे वाटप केले जाणार आहे. त्यापैकी तीन टप्प्यामध्ये १२ हजार लोकांना एकत्रित दाखल्यांचे वाट होईल. सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी ही बाब आहे. दरवर्षी ही योजना राबवण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
रत्नागिरी तालुक्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून रत्नागिरी मतदार संघामध्ये दोन गाड्यांच्या माध्यमातून गावागावात जाऊन दाखले दिले जातील तर अन्य दोन गाड्यांमध्ये फिरता दवाखाना सुरू केला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते. ते म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना विविध दाखल्यांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. या लोकांना मोठा दिलासा द्यावा या उद्देशाने शासनाने शासन आपल्या दारी ही नवी योजना सुरू केली आहे. १३ तारखेला संभुराजे देसाई यांच्या हस्ते योजनेचा आरंभ केला जाणार आहे. रत्नागिरी, लांजा आणि राजापूर, संगमेश्वर गुहागर आणि चिपळूण तर खेड, दापोली आणि मंडणगड या ३ टप्प्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत विविध प्रकारचे शैक्षणिक व अन्य प्रकारचे ७५ हजार दाखले प्रलंबित आहे. यापैकी १२ हजार दाखल्यांचे वाटप केले जाणार आहे. यातून शासन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम करणार आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासाठी मी स्वतंत्र चार गाड्या सुरू करणार आहे. २ गाड्यांमध्ये नायब तहसीलदार, क्लार्क आणि एक अधिकारी असणार आहे. तशा सूचना मी दिल्या आहेत. हे अधिकारी गावागावात जाऊन ग्रामीण जनतेच्या दाखल्यांची समस्या सोडवतील. जागेवर जाऊन ग्रामस्थांना दाखले देतील तर दुसऱ्या दोन गाड्यांच्या माध्यमातून दवाखाना आपल्या दारी ही योजना राबवून डोळे तपासणी, रक्तदाब, हृदयविकार आदींची तपासणी केली जाणार आहे. महिलांमध्ये वाढलेल्या कर्करोगाबाबत अत्याधुनिक मशिनद्वारे तपासणी केली जाणार आहे. या मशिनमुळे पहिल्या टप्प्यात कर्करोगाचे निदान होते. महिला डॉक्टर असतील याची काळजी घेतली जाणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.