
जिल्ह्यातील, परप्रांतीय फेरीवाल्यांचा होणार सर्व्हे
३४ ( पान ३ साठी, सेकंड मेन)
परप्रांतीय फेरीवाल्यांचा होणार सर्व्हे
मंत्री सामंत यांची सूचना ; तूर्तास कारवाई थांबवली
रत्नागिरी ता. १० ः शहरातील फेरीवाले विरुद्ध शहर व्यापारी संघटनेमध्ये सुरू असलेली धुसफूस वाढवण्यापूर्वीच पालकमंत्री उदय सामंत यांनी वातावरण थंड करण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्ह्यातील व परप्रांतीय किती फेरीवाले आहेत याचा सर्व्हे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असून योग्य पद्धतीने समन्वय साधण्यात येईल असे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले. दरम्यान, पुढील निर्णय होईपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करू नका अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
शहरातील रामआळीमध्ये बसणाऱ्या फेरीवाल्यांच्या म्होरक्याकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार शहर व्यापारी संघटनेने पोलिस ठाण्यात दिली होती. रामआळीतील फेरीवाल्यांना हटवण्यात यावे अशी मागणी नगर पालिका व जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. त्यामुळे नगर पालिकेने फेरीवाले हटाव मोहीम राबवण्याचे जाहीर केले. यातून फेरीवाले विरुद्ध व्यापारी असा संघर्ष उभा राहण्याचे चित्र निर्माण झाले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी रत्नागिरी दौऱ्यात शहर व्यापारी संघटना व फेरीवाले यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. बैठकीत जोरदार खडाजंगीही झाली. रामआळीतील फेरीवाल्यांना हटवण्यात यावे व त्यांना अन्यत्र जागा द्यावी अशी प्रमुख मागणी व्यापारी संघटना पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे फेरीवाले व्यावसायिक व लोकप्रतिनिधी आक्रमक झाले होते. फक्त रामआळी ते गोखले नाका परिसरातीलच व्यापाऱ्यांच्या तक्रारी फेरीवाल्यांबाबत असतात, परंतु मच्छीमार्केट परिसरातील व्यापारी व अन्य भागातील व्यापाऱ्यांच्या तक्रारी नसतात असाही मुद्दा काहीनी मांडला. यातील अनेक फेरीवाले हे मतदार असून अनेक वर्षे व्यवसाय करीत आहेत, त्यामुळे त्यांना हटवू देणार नाही असा पवित्रा माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांनी घेतला. या वेळी विजय खेडेकर, किशोर मोरे, स्मितल पावसकर यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने भूमिका मांडली. मात्र सामंत यांनी फेरीवाले व व्यापारी संघटना पदाधिकाऱ्यांची समजूत घातली.
दृष्टीक्षेपात...
*संयुक्त बैठकीत झाली खडाजंगी
*हॉकर्स झोनबाबत लवकरच निर्णय
*रामआळी ते गोखले नाक्यातच तक्रारी
*मच्छीमार्केट परिसरात सारे आलबेल
*नगरसेवकानी मांडली फेरीवाल्यांची बाजू