गुहागर ः केवळ 7200 कासवांची पिल्ले समुद्रात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर ः केवळ 7200 कासवांची पिल्ले समुद्रात
गुहागर ः केवळ 7200 कासवांची पिल्ले समुद्रात

गुहागर ः केवळ 7200 कासवांची पिल्ले समुद्रात

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat११p७.jpg ःKOP२३M०२०७२ गुहागर ः येथील समुद्रकिनाऱ्यावरुन समुद्रात झेपावणारी कासवाची पिल्ले.

कासव संवर्धनात विक्रम, पण प्रजननात अपयश
२३ हजाराहून अधिक अंडी संरक्षित ; केवळ ७२०० पिल्ले समुद्रात, कारणे शोधण्याचे आव्हान
मयुरेश पाटणकर ; सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ११ ः येथील कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी विक्रमी यश मिळाले. आजवरच्या इतिहासात प्रथमच २०० हून अधिक मादी ऑलिव्ह रिडले कासवांची २३ हजारापेक्षा जास्त अंडी कासवमित्रांनी संवर्धित केली; मात्र १० मे पर्यंत सुमारे ७२०० कासवांची पिल्लेच समुद्रात सोडण्यात आली. त्यामुळे प्रजनन दरात प्रचंड घट झाल्याचे समोर येत आहे. याची कारणे शोधण्याचे आव्हान वनविभाग, कांदळवन प्रतिष्ठान आणि कासवमित्रांसमोर उभे ठाकले आहे.
गुहागरमधील कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी सर्वाधिक यश मिळाले. गुहागरच्या साडेसात किलोमिटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर २१९ मादी ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी सापडली. यामधून प्रथमच २३ हजार ७८ अंडी कासव संवर्धन केंद्रात संरक्षित करण्यात आली. याचे मुख्य कारण म्हणजे कांदळवन प्रतिष्ठान आणि वनविभागाने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर देखरेखीसाठी वाढवलेले मनुष्यबळ. यावर्षी प्रथमच ६ कासवमित्रांची नेमणूक संवर्धन आणि संरक्षण मोहिमेसाठी करण्यात आली होती.
कासवांची अंडी संरक्षित केल्यानंतर त्यातून कासवांची पिल्ले बाहेर पडण्याचे प्रमाण हे नेहमीच कमी असते. गुहागरमधील कासव संवर्धनाचा विचार केल्यास दरवर्षी हे प्रमाण ४२ ते ४७ टक्के इतकेच राहिले आहे; मात्र यावर्षी १० मे अखेर २३ हजार ७८ अंड्यांपैकी सुमारे ७२०० अंड्यांमधून पिल्लांचा जन्म झाला. हे प्रमाण केवळ २९ टक्के इतकेच आहे. २१९ घरट्यांपैकी आता केवळ १४ घरट्यातून पिल्ले बाहेर पडणे शिल्लक आहे. सोमवारी (ता. ८) अवकाळी पावसानंतर या घरट्यातून किती पिल्ले बाहेर पडतील याबाबत साशंकता आहे.
ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करण्यात गुहागरची टीम यशस्वी झाली असली तरी प्रजननदराच्या बाबतीत हे मोठे अपयशच म्हणावे लागेल. यावर्षी अवकाळी पावसाबरोबरच सातत्याने असलेले ढगाळ वातावरण हे प्रजनन दर कमी होण्याचे महत्वाचे कारण आहे. याशिवाय आणखी कोणती कारणे आहेत ती शोधण्याचे आवाहन कासव मोहिमेशी संबंधित सर्वांसमोर आहे.
-------
चौकट
वेळासमध्ये प्रजनन दर चांगला
मंडणगड तालुक्यातील वेळास येथे जिल्ह्यातील पहिल्या कासव संवर्धन मोहिमेला सुरवात झाली. या ठिकाणी संवर्धित अंड्यांचा प्रजनन दर सातत्याने ५० ते ९० टक्के ठेवण्यात यश मिळाले आहे. याबाबत कांदळवन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोहन उपाध्ये म्हणाले, कासवाची अंडी दोन तासांच्या आत पुन्हा संवर्धन केंद्रातील खड्ड्यांत जातील, याकडे आमचे लक्ष असते. भरतीरेषेच्या बाहेर घरटे सापडल्यास आम्ही ते घरटे तेथेच संवर्धित करतो. संवर्धनासाठी योग्य जागेची निवड ही सर्वांत महत्वाची असते. झाडांची सावली, खड्ड्यांच्या आत शिरणारी गवताची किंवा झाडांची मुळे तेथील वाळू घट्ट करतात. अंड्यांना दुखापत करतात. संवर्धन केंद्रामधील खड्ड्यांमध्ये सतत होणारी सुक्ष्म हालचालही प्रजनन दरावर मोठा परिणाम करते.