‘श्री’ पद्धतीचा अवलंब करा

‘श्री’ पद्धतीचा अवलंब करा

03826
संग्रहित छायाचित्र
--

‘श्री’ पद्धतीचा अवलंब करा

कृषी विभागाचे आवाहन; कुडाळात खरीपाची पूर्वतयारी सुरू

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ ः खरीप हंगामाला आता काहीच दिवस उरले असून शेतकऱ्यांनी त्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. कुडाळ तालुक्यात खरीप हंगाम सर्वसाधारणपणे १४००० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. जिल्ह्यातील काही प्रगतशील शेतकऱ्यांचे उत्पादन व तालुक्यातील शेतकऱ्यांचे सरासरी उत्पादन यामध्ये मोठी तफावत दिसून येते. त्यासाठी भात लागवडीची ‘श्री’ पद्धत शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोचविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे, अशी माहिती कुडाळ तालुका कृषी विभागाकडून देण्यात आली.
सुधारीत व संकरित भात बियाण्यांचा वापर, पावर टिलर-पावर विडर यांच्या वापरामुळे वेळेत होणारी लागवड यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा भात उत्पादनाकडे अधिकाधिक कल दिसून येत आहे. पारंपरिक भाताला मिळणारा वाढीव दर पाहता त्याच्या दृष्टीनेही शेतकऱ्यांची पावले वळू लागली आहेत. ‘सिंधुरत्न’ योजनेतून यावर्षी खरीप हंगामात कुडाळ तालुक्यात ३९० हेक्टर क्षेत्रावर ‘श्री’ पद्धतीने भात पीक लागवडीची प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. त्यासाठी अनुदान देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रात्यक्षिकांसाठी ‘रत्नागिरी ८’, या सुधारीत जातीचे बियाणे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध झाले आहे. दरम्यान, अधिकाधिक शेतकऱ्यांनी ‘श्री’ पद्धतीने भात लागवड करण्याचे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
---
श्री पद्धतीचे फायदे असे
- या योजनेत किमान १० हेक्टर क्षेत्रावर क्लस्टर पद्धतीने सुधारीत लागवड तंत्रज्ञान वापरून लागवड करणे गरजेचे आहे. ‘श्री’ पद्धतीने लागवडीचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत. १ हेक्टरला केवळ ८ ते १० किलो बियाणे पुरेसे आहे. पारंपरिक पद्धतीत ते ५० ते ६० किलोपर्यंत वापरावे लागते. गादीवाफ्यावर पेरणी होत असल्याने रोपांची वाढ चांगली होते व रोपे काढण्यासाठी मजुरी कमी लागते.
--
...तर तण नियंत्रण शक्य
- २५ बाय १५ सेंटीमीटर अंतरावर लागवड होत असल्याने रोपांची संख्या पुरेशी मर्यादित राहते. कोळप्याचा वापर करून तण नियंत्रण करणे शक्य होते व मुळांना पुरेसा सूर्यप्रकाश व हवा मिळते. दोन आठवड्याची रोपे खोलीवर लावायची असल्याने पुनर्लागवड कमी वेळेत व कमी खर्चात होते. एकूण परिणाम म्हणून उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढल्याने नफा वाढतो.
--
कोट
श्री पद्धतीने भात लागवड फायद्याची आहे. ज्या शेतकऱ्यांना ‘श्री’ पद्धतीने लागवड करावयाची असेल, त्यांनी आपल्या गावच्या कृषी सहाय्यकांशी त्वरित संपर्क साधावा.
- अश्विनी घाटकर, तालुका कृषी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com