रेती उपसावर 
ठाण्यात कारवाई

रेती उपसावर ठाण्यात कारवाई

रेती उपसावर
ठाण्यात कारवाई
ठाणे, ता. १६ : ठाणे जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून मुंब्रा, भिवंडी, कल्याण आदी खाडीकिनारी भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या रेतीउपसा करण्यात येत आहे. या विरोधात ठाणे जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जानेवारी ते मार्च २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधीत ठिकठिकाणी कारवाई करीत १९ सक्शन पंप, १६ बार्जसह रेती हौदांवर कारवाई करीत चार कोटी २५ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून दोन गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
ठाणे, कल्याण आणि भिवंडी खाडी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैद्य रेतीउपसा सुरू असल्याबाबात जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेतीबंदर, कोण कशेळी काल्हेर, कोपर ते मोठागाव ठाकुर्ली रेती बंदर, पारसिक रेतीबंदर, कल्याण रेती बंदर, कशेळी खाडीपात्र, मोडक सागर धरण, उल्हास नदी खाडीपात्र आदी विविध ठिकाणी स्थानिक तहसीलदार विभागाच्या माध्यमातून अवैद्य रेतीउपशावर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती.
---
रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू
डोंबिवली, ता. १६ : ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेची धडक बसल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. हे तरुण रेल्वेरूळ क्रॉस करत असावेत किंवा रील बनविण्यासाठी रेल्वेरुळांवर गेले असावेत. तेव्हा गाडीचा अंदाज न आल्याने त्यांना रेल्वेची धडक बसून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज रेल्वे पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात करण्यात आली असून मुलांचे मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
सोमवारी सायंकाळी एका दुर्घटनेत दोन तरुणांना आपला जीव गमावला आहे. चेतन गोगावले (२२) आणि सुयोग उत्तेकर (२५) अशी दोघांची नावे असून दोघेही डोंबिवली पूर्वेतील रहिवासी आहेत. ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेची धडक या तरुणांना बसली. त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर इजा झाली होती. त्यांना त्वरित शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या दोन्ही तरुणांचे मृतदेह त्यांच्या परिवाराकडे देऊन कल्याणमधील रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पंचनाम्यासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
--
नदी प्रदूषण रोखण्यासाठी
रात्रीची टँकरवर बंदी
डोंबिवली, ता. १६ : ठाणे जिल्ह्यातील अनेक नद्या प्रदूषित झाल्या आहेत. एमआयडीसीमधील कारखान्यांतून रासायनिक सांडपाणी हे प्रक्रिया न करता अनेकदा तसेच सोडले जाते. त्यातच रात्रीच्या वेळेस नाले, खाडी, नदीपात्रात टँकरमधून रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याची बाब उघड झाली आहे. हे नदीप्रदूषण रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळेस सर्व प्रकारच्या टँकरला बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी अद्यापही कायम ठेवण्यात आली आहे. १२ जुलैपर्यंत ही बंदी कायम करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथसह बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकरच्या माध्यमातून धोकादायक केमिकल नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषित होऊन लोकांच्या आरोग्यास धोका व नदीतील जैवविविधतेवर परिणाम होतो. याला आळा घालण्यासाठी ठाणे शहर विशेष शाखेचे पोलिस आणि वाहतूक पोलिसांकडून औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला रात्रीच्या वेळेस बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी अजून ही कायम ठेवण्यात आली आहे. १४ मे पासून १२ जुलैपर्यंत संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणे शहर विशेष शाखेकडून सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com