
पाणीटंचाई आढावा बैठक तत्काळ घ्या
03246
सावंतवाडी ः तहसीलदार अरुण उंडे यांच्याशी चर्चा करताना रुपेश राऊळ.
पाणीटंचाई आढावा बैठक घ्या
रुपेश राऊळ; सावंतवाडीत तहसीलदारांशी चर्चा
सावंतवाडी, ता. १६ ः सध्या तापमानात मोठी वाढ होत असून उष्णतेच्या तीव्रतेने पाणीपातळी कमी होत आहे. त्यामुळे सावंतवाडी शहरासह तालुक्यातील अनेक भागांत पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता असताना प्रशासनाने अद्याप नियोजन बैठक बोलाविली नसल्याने उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी तहसीलदार अरुण उंडे यांची आज भेट घेऊन चर्चा केली. यावेळी तातडीने आढावा बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, उपतालुकाप्रमुख आबा सावंत, विभाग प्रमुख सुनील गावडे, उपविभाग प्रमुख विनोद ठाकूर, प्रशांत बुगडे आदी उपस्थित होते. यंदाच्या हंगामामध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती आणि त्याची वस्तुस्थिती सध्या नागरिकांना जाणवत आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे भूगर्भातील जलपातळी कमी झाली असून नदीनाल्यांचे पाणी देखील आटले आहे. शहरातील मोती तलावाचे पाणी देखील सोडण्यात आल्याने शहरात नैसर्गिक पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सर्वत्र पाणीटंचाईचे संकट येण्याची शक्यता असताना प्रशासनाने याबाबत आढावा बैठक घेण्याचे का टाळले, असा प्रश्न राऊळ यांनी उपस्थित केला. लवकरात लवकर आढावा बैठक घेऊन पाणीटंचाईची नियोजन करावे, असेही तहसीलदार उंडे यांना यांना सुचविले. याशिवाय शहरासह तालुक्यातील पाणीटंचाईचा आराखडा करताना पावसापूर्वी कामे पूर्ण होतील याबाबत दक्षता घ्यावी; अन्यथा नागरिकांना त्याचा फायदा होणार नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी तहसीलदार उंडे यांनी आठवडाभरात पाणीटंचाईबाबत बैठक घेण्याची ग्वाही दिली.