
चाकरमान्यांसाठी खासगी गाड्याना पसंती महागडी
३५ (पान ५ साठी)
खासगी वाहनांना पसंती
राजापूर, ता. १७ ः मुंबईकर चाकरमान्यांना परतीचे वेध लागले असून एसटीसह खासगी वाहतूकदाराना फायदा होत आहे. एसटीच्या तुलनेमध्ये खासगी गाडीधारकांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट आकारणी केली जात आहे. त्यामध्ये प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याने ‘खासगी गाडीचा प्रवास नको रे बाबा’ अशी म्हणण्याची वेळ प्रवाशांवर येऊन ठेपली आहे.
यावर्षीही तालुक्यातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर आले आहेत. लग्नसराईसह मे महिन्याचा हंगाम अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. त्यामुळे मुंबईकर चाकरमान्यांना परतीचे वेध लागले आहेत. परतीच्या मार्गावर असलेल्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी येथील एसटी आगारानेही व्यवस्था केली आहे. परतीच्या मार्गाचे तिकिटांचे आरक्षण करण्यासाठी आगारासह तालुक्यामध्ये ठिकठिकाणी आरक्षण केंद्रही सुरू केली आहेत. तसेच ऑनलाईन आरक्षण केंद्रही सुरू करण्यात आली आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये जाणाऱ्या नियमित गाड्यांचे वेळापत्रक सांभाळत चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी आगार प्रशासनाने जादा गाड्यांचेही नियोजन केले असून त्याचा लाभ विविध कारणांमुळे तोट्यात असलेल्या एसटी आगारासह चाकरमान्यांना होताना दिसत आहे. एका बाजूला चाकरमान्यांना एसटीकडून चांगली सुविधा उपलब्ध करून दिली जात असतानाही त्यांच्याकडून परतीच्या प्रवाशासाठी खासगी गाड्यांना पसंती दिली जात आहे.
कोट
खासगी गाड्यांच्या वाढलेल्या तिकीट दरांमुळे खासगी गाड्यांमधून प्रवास करण्याने आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडून जात आहे. मात्र, खासगी गाडीमधील प्रवास सुखकारक आणि वेळेमध्ये होत असल्याने खासगी गाड्यांशिवाय पर्याय नाही.
-सुभाष देसाई, प्रवासी