दाभोळ ः दापोलीतील पर्यटन उद्योगाला नाही अपेक्षित गती

दाभोळ ः दापोलीतील पर्यटन उद्योगाला नाही अपेक्षित गती

फोटो ओळी
-rat१९p२७.jpg-KOP२३M०३७७२ मंडणगड ः बाणकोट येथील रखडलेला पूल.
------------

दापोलीतील पर्यटन उद्योगाला नाही अपेक्षित गती

बाणकोट, केळशी खाडीवरील पूल रखडले ; दळणवळणावर मर्यादा

दाभोळ, ता. १९ ः राज्यातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला सागरी मार्गाने जोडणाऱ्या मंडणगड तालुक्यातील बाणकोट आणि दापोली तालुक्यातील केळशी खाडीवरील रखडलेल्या पुलांमुळे हरिहरेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांना दापोलीची दूरची वाट धरावी लागते. याचा येथील पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींसोबत येथील हॉटेल व्यावसायिकांनी या पुलांच्या जलद पूर्णत्वासाठी पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे.
मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणेच सागरी महामार्गही रखडल्याने कोकणचा मुख्य आधार बनू पाहत असलेला पर्यटन उद्योग अपेक्षित उंची गाठू शकलेला नाही. दापोली-मंडणगडमधील बाणकोट, केळशी खाडी पूल पूर्णत्वाच्या तर दाभोळ खाडीवरील पूल मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने दापोलीतील पर्यटन उद्योगाने अद्याप गती घेतलेली नाही. हा महामार्ग वेळेत पूर्ण झाला असता तर येथील पर्यटन उद्योग अधिक बहरला असता. सध्या दापोली तालुका पर्यटन उद्योगाने बाळसे धरले आहे. पूर्वी गोव्याला जाणारे पर्यटक दापोलीतील बीचना अधिक पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे येथील पर्यटन उद्योगाने कात टाकली असून, पूर्वी मर्यादित गावांमध्येच होणारी न्याहारी निवास आणि रिसॉर्टची व्यवस्था आता अनेक किनाऱ्यांवर विस्तारली आहे. पर्यटकांच्या वाढत्या मुळे काही वर्षातच येथे स्थानिक आणि परजिल्ह्यातील भांडवलदारांनीही मोठमोठे रिसॉर्ट बांधले आहेत. सध्या ताजे मासे आणि स्वच्छ किनारे हेच येथील पर्यटनाचे प्रमुख आधार राहिले आहेत; मात्र याच जोडीला येथील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक स्थळे आणि अंतर्गत भागातील कृषी पर्यटन स्थळेही पर्यटकांना आकर्षित करू लागल्याने स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण झाला आहे. सागरी महामार्गामुळे येथील पर्यटन उद्योग अधिकच बहरण्याची आशा बाळगून असलेल्या जनतेची बाणकोट, केळशी आणि दाभोळ खाड्यांवरील रखडलेल्या पुलांमुळे निराशा झालेली आहे.

पर्यटनास फटका
हरिहरेश्वर हे मोठे तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक पर्यटक येत असतात; मात्र बाणकोट केळशी खाड्यांवरील पूल अर्धवट स्थितीत असल्यामुळे पर्यटकांना फेरीबोटीचा आधार बाणकोट व दाभोळ खाडीत घ्यावा लागत आहे. बाणकोट व केळशी खाडीवरील दोन्ही पूल वेळेत पूर्ण झाले असते तर दापोलीतील पर्यटनाची गती नक्कीच दुप्पट झाली असती; मात्र येथील लोकप्रतिनिधींसोबत नागरिकही याबाबत आवाज उठवत नसल्याचे दिसून येत आहे. किमान पर्यटन व्यावसायिकांनी आता यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com