स्थानिकांची शिक्षक भरती करा

स्थानिकांची शिक्षक भरती करा

03920
दादा साईल


स्थानिकांची शिक्षक भरती करा

दादा साईल; परजिल्ह्यातील उमेदवारांना थारा नाही

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० ः आंतरजिल्हा बदलीनंतर सिंधुदुर्गात केवळ ७० टक्केच शिक्षक उरले आहेत. जिल्ह्यातील शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी शिक्षक म्हणून स्थानिकांना सामावून घ्या. अन्य जिल्ह्यातील उमेदवारांना थारा देणार नाही, असा इशारा भाजपचे कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी दिला आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात साईल यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील सुमारे ४५० पेक्षा अधिक शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीने जाण्याचा निर्णय घेतल्याने तब्बल ३० टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त झाली आहेत. त्याचवेळी इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या शिक्षकांची संख्या केवळ ११ एवढीच आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात ७० टक्के शिक्षकांवर शिक्षण विभागाची धुरा असणार आहे. पुढील शैक्षणिक टाळण्यासाठी शिक्षक भरतीच्या वेळी जिल्ह्यातील बेरोजगार आणि स्थानिकांनाच सामावून घ्यावे, अशी मागणी केली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, माजी मुख्यमंत्री नारायण राणे पालकमंत्री असताना त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि त्यांनी शिक्षण विभागात केलेल्या आमूलाग्र बदलांमुळे जिल्ह्यात शिक्षण क्रांती होऊन येथील सर्व प्रकारच्या शिक्षण, तंत्रशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाची कवाडे विद्यार्थ्यांना खुली झाली. संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शैक्षणिक पॅटर्न हा ‘१०० टक्के निकालाचा पॅटर्न’ म्हणून प्रसिद्ध झाला. सध्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही मुलांना उच्च दर्जाचे प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षण मिळावे आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी ई-शिक्षणाचा पर्याय देखील उपलब्ध केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची मुदत संपल्याने व नवीन निवडणुका न झाल्याने जिल्हा परिषदेचा कारभार सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हाती आहे; परंतु त्यांना याबाबत काही देणेघेणे नसल्याने त्यांनी शिक्षक बदलीच्या वेळी केवळ बघ्याची भूमिका घेतली आणि एकाच वेळी जिल्ह्यातील तब्बल ४५३ हुन अधिक शिक्षकांना कार्यमुक्त केले. आता ७० टक्के शिक्षकांवर जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाचा बोजा असणार आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात विद्यार्थ्यांना नेमके कोणत्या दर्जाचे प्राथमिक शिक्षण मिळेल, असा प्रश्न सर्वसामान्य पालकांना पडला आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये सुमारे ३९७३ शिक्षकांची पदे मंजूर असून त्यापैकी ४५३ एवढे शिक्षक जिल्हा बदलीने गेल्याने रिक्त झालेल्या पदांची संख्या १११८ पर्यंत पोचली आहे. मुळातच श्रावण मास आणि त्यात अधिक महिना अशी शिक्षण विभागाची अवस्था सध्या झाली असून याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी हेच आहेत, असा आरोपही साईल यांनी केला आहे.
...............
बॉक्स
‘अन्यथा रोषाला सामोरे जा’
शिक्षक भरती किंवा कोणत्याही शासकीय नोकर भरतीवेळी परजिल्ह्यांतील बरेच उमेदवार येऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भरती होतात. नोकरीच्या काही कालावधीनंतर जिल्हा बदली घेऊन आपल्या स्वगृही जाण्याचा मार्ग अवलंबतात. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना त्याचा त्रास भोगावा लागतो. त्यामुळे यानंतर कोणत्याही विभागात सरकारी नोकर भरती होत असताना सिंधुदुर्गातील स्थानिकांना नोकरीत सामावून घ्यावे, यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. परजिल्ह्यातील उमेदवारांना जिल्ह्यामध्ये सरकारी नोकरीत भरती होताना आम्हालाही आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, याची नोंद परजिल्ह्यांतील उमेदवारांनी आणि आता नोकरीत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी घ्यावी; अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा पत्रकातून साईल यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com