
राजापूरला 525 टन खत उपलब्ध
पान ५ साठी
राजापूरला ५२५ टन खत उपलब्ध
खरेदी-विक्री संघ; खरीप हंगामासाठी १५२.५२ क्विंटल बियाण्याची मागणी
राजापूर, ता. २० ः दरवर्षीप्रमाणे या वर्षीच्याही खरीप हंगामाठी राजापूर तालुका खरेदी-विक्री संघाने खत व भातबियाणे पुरवठ्याबाबत सुयोग्य असे नियोजन केले आहे. या वर्षीही शेतकऱ्यांना हंगामाच्या प्रारंभीच खत व भातबियाण्यांचा पुरवठा करता यावा यासाठी विविध प्रकारच्या २१०० मेट्रिक टन खतांची मागणी तर विविध प्रकारच्या १५२. ५२ क्विंटल भातबियाण्यांची मागणी संघाने पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडे नोंदवली आहे. यापैकी ५२५ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले असून त्याचे वितरणही झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष चंदक्रांत जडयार व व्यवस्थापक दीपक कानविंदे यांनी दिली आहे.
राजापूर तालुका खरेदी-विक्री संघाकडून दरवर्षीच रब्बी, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खते, विविध प्रकारची बियाणी पुरवली जातात. यावर्षीही खरीप हंगामासाठी संघाच्यावतीने प्रारंभीपासूनच नियोजन हाती घेण्यात आले असून, आवश्यक ती खते व भातबियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. भातपिकासह बागायदारांना लागणाऱ्या खंतांची सुमारे २१०० टन इतकी मागणी संघाने केली आहे. यामध्ये युरियाची सर्वाधिक म्हणजे ११०० टन, सुफला ४५० टन, समर्थ (१० २६ २६) ४०० टन, एसएसपी २०० टन, मिश्र (१८१८१०) २०० टन, डीएपी २० टन, पोटॅशियम ३० टन अशी मागणी खताचा पुरवठा करणाऱ्या जुवारी, मार्केटिंग फेडरेशन, कृषी उद्योग महामंडळ यांच्याकडे करण्यात आली आहे तर तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या व मागणी असणाऱ्या विविध प्रकारच्या १५२.५२ क्विंटल भातबियाण्यांची मागणी केली आहे.
तालुक्यातील विविध प्रमुख १५ सोसायट्यांच्यामार्फत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना खते आणि भातबियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. काही अडचण वा शंका असल्यास शेतकऱ्यांनी राजापूर खरेदी-विक्री संघाशी संपर्क साधण्याचे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
विविध प्रकारची बियाणे
सुवर्णा, जया, कर्जत, एचएमटी, रत्नागिरी ६, रत्नागिरी ८, सारथी, पूनम, कोमल, गंगोत्री, सह्याद्री, मधुमती, वैष्णवी यांसाख्या विविध प्रकारच्या ३२ जातींच्या भातबियाण्यांची नोंदणी केली आहे. खते आणि भातबियाणी उपलब्ध होताच तातडीने त्याची शेतकऱ्यांना विक्री केली जाणार आहे.