
गुहागर-लाभार्थी जाणार शासनाच्या दारी
rat२२p२०.jpg-
04306
गुहागरः आरे ग्रामपंचायतीतर्फे दाखले देण्यासाठी आयोजीत केलेला कार्यक्रम.
--------------
गुहागरचे लाभार्थी जाणार रत्नागिरीत
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी नियोजन ; ३१ बसेसची व्यवस्था
गुहागर, ता. २२ : शासन आपल्या दारी उपक्रमाच्या उद्घाटनासाठी २५ मे रोजी मुख्यमंत्री रत्नागिरीला येत आहेत. या कार्यक्रमाला गुहागर येथील शासकीय योजनांचा लाभ घेणारे किंवा वर्षभरात घेतलेल्या ग्रामस्थांना रत्नागिरी नेण्याचे नियोजन सुरू आहे. महसूल, आरोग्य, कृषी, ग्रामीण पाणी पुरवठा आदी सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी सध्या संख्या निश्चितीसाठी दारोदार पळताना दिसत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील उपक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २५ मे रोजी रत्नागिरीत येत आहेत. त्याच्या उपस्थितीत विविध योजनांच्या मंजुरीची पत्रे लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाला जिल्हाभरातून उपस्थिती रहावी यासाठी सध्या प्रशासन कार्यरत झाले आहे.
तालुक्यातील आवास योजनेत घर मिळालेले लाभार्थी, बँकांकडून कर्ज मिळालेले महिला बचत गट, जलजीवन मिशनमधील हर घर नळ मध्ये नळ जोडणी मिळालेले लाभार्थी, कृषी विभागातील फळबाग लागवड योजना व स्वावलंबी शेतकरी योजना, आरोग्य विभागाचे आभा कार्ड लाभार्थी, महसुल विभागामार्फत संजय गांधी निराधार योजना व विविध प्रकारचे दाखले मिळालेले लाभार्थी अशा विविध प्रशासकीय विभागांची लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक विभागाने आपल्या लाभार्थ्यांपर्यंत पोचून त्यांच्या रत्नागिरी दौऱ्याची निश्चिती करून त्याची माहिती अधिकाऱ्यांमार्फत तहसीलदारांपर्यंत पोचवायची आहे.
योजनेच्या यशस्वीतेसाठी थेट तहसीलदारांकडून याचा पाठपुरावा सुरू झाला आहे. प्रत्येक गावातील लाभार्थ्यांची संख्या निश्चित करून त्याप्रमाणे प्रत्येक मंडलामध्ये एसटीचे नियोजन तहसील कार्यालयामार्फत केले जाणार आहे. तालुक्यातून सुमारे १२०० लाभार्थ्यांना आणण्याचे उद्दिष्ट दिले आहे. या लाभार्थ्यांना रत्नागिरीत घेवून जाणे व तेथून परत तालुक्यातील गावापर्यंत पोचविण्यासाठी सुमारे ३१ एसटी बसेसची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रत्येक एसटीबरोबर शासनाचा एक कर्मचारी देण्यात येणार आहे. प्रवासामध्ये एकवेळच्या भोजनाची व्यवस्थाही शासनामार्फत केली आहे.
कोट
शासकीय योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोचावी. जास्तीत जास्त ग्रामस्थांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा यासाठी मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला लाभार्थ्यांना घेवून जाण्याचे नियोजन केले आहे.
- प्रशांत राऊत, गटविकास अधिकारी, गुहागर