पाण्यासाठी रत्नागिरीत मोर्चा, ठिय्या आंदोलन

पाण्यासाठी रत्नागिरीत मोर्चा, ठिय्या आंदोलन

४३०४
४३०५

पाण्यासाठी मोर्चा, ठिय्या
रत्नागिरीत काँग्रेस आक्रमक; हंडा, कळशी घेऊन नागरिक पालिकेत
रत्नागिरी, ता. २२ ः ‘घरात नाही पाणी म्हणे शासन आपल्या दारी’, ‘नगरपालिका हाय हाय’ अशा घोषणा देत काँग्रेसच्या वतीने रत्नागिरी नगरपालिकेवर हंडा-कळशी मोर्चा काढला. मुख्याधिकाऱ्‍यांच्या केबिनबाहेर ठिय्या मांडत नागरिकांनी अपुरा पाणीपुरवठ्याची समस्या आणि गढूळ पाण्यापासून आमची मुक्तता कधी करणार, असा जाब विचारला.
सोमवारी (ता. २२) दुपारी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अश्विनी आगाशे, राज्याच्या सरचिटणीस रूपाली सावंत, सुष्मिता सुर्वे यांच्यासह दीपक राऊत, कपिल नागवेकर, साजिद पावसकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील नाराज नागरिकांसह पालिकेवर धडक दिली. शहरात पाण्याची बिकट अवस्था आहे. अनेक भागांतील पाण्याचे स्रोत कोरडे पडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्‍या शीळ व पानवल धरणाची पाण्याची पातळीही कमी झाल्याने दिवसाआड पाणी सुरू आहे. पानवल धरणातील पाणी पूर्णत: बंद झाले असून, फक्त शीळ धरणातून येणाऱ्‍या पाण्यावरच शहराची तहान भागवली जात आहे. मुबलक पाणी मिळत नसल्याने काँग्रेसने पाण्यासाठी हंडा कळशी मोर्चा काढत नागरिकांची समस्येला वाचा फोडली. यावेळी महिलांनी जोपर्यंत पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत मागे हटायचे नाही, अशी भूमिका मांडली.
दालनाबाहेर ठिय्या मांडलेल्या आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पाच जणांच्या शिष्टमंडळाने आत यावे, अशी विनंती मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केली; मात्र तुम्हीच बाहेर या, असा निरोप आंदोलकांनी दिला. त्यानंतर मुख्याधिकारी बाबर यांनी दालनाबाहेर येऊन आंदोलकांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. करोडो रुपयांची योजना राबवली गेली आहे; पण २४ तास सोडा एक तासदेखील पाणी मिळत नाही. तसे असेल तर या योजना योजना काय कामाच्या असा प्रश्‍न महिलांनी उपस्थित केला. यावेळी गढूळ पाण्याची बाटली त्यांनी मुख्याधिकाऱ्‍यांना दाखवली. अ‍ॅड. अश्विनी आगाशे यांनी धरणांचे काही फोटो मुख्याधिकाऱ्‍यांना दाखवले. शीळ धरण हे पूर्ण आटलेले असून, या धरणाला आता डबक्याचे स्वरूप आले आहे. यावरून हे धरण आहे की डबके, असा प्रश्‍न केला.
आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्याधिकारी बाबर यांनी सांगितले, शहरात नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे. जिथे गळती आहे, ती काढण्यात येत आहे. धरणाजवळील दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असून, पुण्याच्या संस्थेकडून पाहणी केली आहे. जीवन प्राधिकरणाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. लवकरच त्यावर तोडगा काढला जाईल. तसेच गढूळ पाण्यापासून शहरवासीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

....तरच २४ तास पाणी
शहराला २४ तास पाणी मिळणार, अशी घोषण नगरपालिकेकडून केली होती. त्याचे काय झाले, असा प्रश्‍न नागरिक विजय जैन यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी केला. तेव्हा पाणी विभागाच्या कर्मचाऱ्‍याने हे सध्या शक्य नाही, असे सांगितले. शीळ आणि पानवल या दोन्ही धरणांतून पाणी सुरू होत नाही, तोपर्यंत २४ तास पाणी देता येणार नाही, असे पाणी विभागाच्या कर्मचाऱ्‍याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com