घनकचरा प्रकल्पासाठी एमआयडीसीत जागा

घनकचरा प्रकल्पासाठी एमआयडीसीत जागा

घनकचरा प्रकल्पासाठी एमआयडीसीत जागा
उदय सामंत ; अनेक वर्षे रखडलेला कचऱ्याचा प्रश्न सुटणार
रत्नागिरी, ता. २३ : गेली अनेक वर्षे रखडलेला रत्नागिरी पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचा प्रश्न एकदाचा मार्गी लागला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे एमआयडीसीमध्ये ३ एकर जागा मिळविण्यात यश आले आहे. त्यामुळे पुढील चार महिन्यात उर्वरित प्रक्रिया होऊन घनकचरा प्रकल्पाच्या कामाला सुरवात होणार आहे. त्यामुळे साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राऊंडमुळे होणाऱ्या दुर्गंधी आणि धुराच्या समस्येतून तेथील नागरिकांची कायमची सुटका होणार आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी शासकीय विश्रमगृहात आयोजित पत्रकार परिषदेत याला दुजोरा दिला. रत्नागिरी पालिकेने स्वच्छ भारत अभियानात देशात नाव केले असले तरी स्वतःच्या घनकचरा प्रकल्पाबाबत अजून पालिका उदासिन होती. अनेक ठिकाणी जागा निश्चित करूनही त्याला विरोध झाल्यामुळे घनकचरा प्रकल्प रखडला होता. अखेर पालिकेच्या दांडेआडोम येथील जागेमध्ये घनकचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला. त्यासाठी जागेला कंपाऊंड घेऊन सुमारे १५ कोटीचा डीपीआर तयार करण्यात आला होता. परंतु त्याला विरोध झाल्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले. अनेक वर्षे लढा देऊन दांडेआडोम येथील सुमारे ६ एकर जागेचा विषय न्यायालयात पालिकेच्या बाजूने लागला. त्यामुळे या जागेवर पालिकेचा हक्काचा अत्याधुनिक प्रकल्प होणार हे निश्चित होते. मात्र काही राजकीय हेतू साध्य करण्यासाठी आणि तेथील नागरिकांना दिलेल्या शब्दापोटी प्रकल्प रद्द करण्यात आला.
हक्काची जागा सोडून पालिका एमआडीसीतील जागेच्या मागे आहे. तसा प्रस्ताव दिला असला तरी अजून एमआयडीसीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नव्हता. परंतु पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यासाठी प्रयत्न केल्याने एमआयडीसीतील ३ एकर जागा मिळाली आहे. पुढील चार महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष घनकचरा प्रकल्पाच्या कामाला सुरवात होईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

चौकट-
साळवी स्टॉप झालाय कचऱ्याचे आगर
शहरातील साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राऊंडवर वर्षानुवर्षे शहरातील घनकचरा टाकला जातो. त्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी आणि कचऱ्याला आग लागल्यामुळे धुराचा त्रास होतो. या भागात १ लाख ५६ हजार क्युबिक मिटर घनकचरा टाकला जात आहे. त्यापैकी काही क्युबिक मिटर घनकचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली आहे. परंतु घनकचरा टकण्याची समस्या सुटली नव्हती. आता एमआयडीसीत जागा मिळाल्यामुळे या समस्या सुटण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com