खेड ः गाळ न काढल्यास नदीत अर्धनग्न आंदोलन करू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः गाळ न काढल्यास नदीत अर्धनग्न आंदोलन करू
खेड ः गाळ न काढल्यास नदीत अर्धनग्न आंदोलन करू

खेड ः गाळ न काढल्यास नदीत अर्धनग्न आंदोलन करू

sakal_logo
By

गाळ न काढल्यास नदीत अर्धनग्न आंदोलन

माजी आमदार संजय कदम यांचा इशारा; जगबु़डीतील गाळामुळे पुराचा धोका
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. 26 ः पावसाळा जवळ आला तरीदेखील प्रशासनाकडून खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीतील गाळ न काढल्यामुळे यंदादेखील शहरात पूर भरण्याचा धोका निर्माण झाला असून, व्यापारी चिंतेत आहेत. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये शहराला पुराने वेढले होते. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. त्या वेळी नदीतील गाळ काढण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते; मात्र पावसाळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना जगबुडी नदीतील गाळ जैसे थे आहे. या निषेधार्थ माजी आमदार संजय कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आठवडाभरात जगबुडी नदीतील गाळ काढला गेला नाही तर अर्धनग्न अवस्थेत जगबुडी नदीत आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये जगबुडी नदीने रौद्र रूप धारण केले होते. मोठ्या प्रमाणात जगबुडी नदीपात्रात गाळ साचल्यामुळे थोडासा पाऊस झाला तरी देखील खेड शहरात पुराचे पाणी शिरते. परिणामी, व्यापाऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. दरवर्षी खेडच्या बाजारपेठेत व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे करोडो रुपयांचे नुकसान होते.
दोन वर्षांपूर्वी पुराची भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी प्रशासनाने जगबुडी नदीतील गाळ काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर गेल्या वर्षी देखील खेडमधील सर्व व्यापारी संघटनांनी थेट मुख्यमंत्र्यांना जाऊन गाळ काढण्यासंदर्भात पत्रदेखील दिले होते; मात्र व्यापाऱ्यांच्या गाळ काढण्याच्या या मागणीला प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. रायगड जिल्ह्यातल्या सावित्री नदीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरवात झाली. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पात्रातील गाळ काढण्याचे कामदेखील मोठ्या प्रमाणावर झाले आणि अजून सुरूदेखील आहे. मग खेडच्या जगबुडी नदीचे गाळ करण्याचे घोडे नेमकं कुठे अडले, असा प्रश्न माजी आमदार संजय कदम यांनी उपस्थित केला असून आता पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे येथे आठवडाभरात जर गाळ काढला गेला नाही तर यंदाच्या पावसाळ्यातदेखील पुरामुळे नुकसान ठरू शकते. स्थानिक व्यापाऱ्यांनीदेखील जपून नदीतील गाळ काढण्यासाठी वर्गणी काढून आर्थिक तरतूद करत शासनाला सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली असताना प्रशासनाकडून यावर्षी गाळ काढण्यासाठी विलंब झाला आहे. हे खेदजनक असून, आता केवळ एक आठवडा उरला असून येत्या दोन दिवसात जर गाळ काढायला सुरवात केली नाही तर सर्व व्यापारी बंधू नागरिकांसोबत आपण स्वतः जगबुडी नदीपात्रात उतरून अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार संजय कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला आहे.