
टंचाईमुळे शहरात दिवसाला लाख लिटर जादा पाणी
पान १
रत्नागिरीत दिवसाला एक लाख लिटर पाणी टॅंकरने
---
१ मेपासून मागणीत वाढ; पालिकेतर्फे आतापर्यंत ३९१ फेऱ्या
राजेश शेळके ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः शहरातील पाणीटंचाई अधिक गडद होत चालली आहे. दिवसाआड पाणीपुरवठा केल्यापासून एप्रिलमध्ये दरदिवशी टंचाईग्रस्त भागात पाच ते सहा टॅंकर लागत होते. मात्र, मेपासून पाण्याची मागणी वाढली आहे. आता दिवसाला १० ते १५ टॅंकरच्या फेऱ्या होत असून, आतापर्यंत ३९१ फेऱ्या झाल्या आहेत. शहराच्या वरच्या भागात सर्वाधिक टॅंकर लागत आहेत. म्हणजे नियमित २१ एमएलडी पाणीपुरवठ्यासह दिवसाला एक लाख पाच हजार लिटरच्यावर पालिकेला टॅंकरद्वारे जादा पाणीपुरवठा करावा लागत आहे.
रत्नागिरी शहराला यंदाही भीषण टंचाईचा सामना कारावा लागत नसला, तरी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत आहे. शहरात सुमारे साडेदहा हजार नळजोडण्या आहेत. दरदिवशी शहराला शीळ धरणातून सुमारे २१ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यात सुधारित पाणीपुरवठा योजना सुरू झाल्याने गळतीचे प्रमाण ४० टक्क्यांवरून शुन्यावर आले आहे; परंतु वारंवार नवीन पाइपलाईन फुटत असल्याने गळतीच्या तक्रारी काही कमी होताना दिसत नाहीत. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, यंदा पाऊस लांबण्याची शक्यता आहे. त्यानुसार रत्नागिरी पालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले.
शीळ धरणात १५ जूनपर्यंत पुरेल एवढा साठा आहे; परंतु पाऊस लांबला तर पाण्याची भीषण टंचाई भासू शकते. म्हणून १७ एप्रिलपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शहरात नियमित २१ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो; परंतु दिवसाआड पाणी येत असल्याने मोठ्या प्रमाणात साठवणूक होते. ज्याला मिळते त्याला मिळते अन्यथा अनेकांची भांडी रिकामी राहतात. शहरात ज्या भागात कमी दाबाने पाणी जाते, त्या भागात टंचाई भासत आहे. अशा भागात पालिकेच्या चार हजार आणि तीन हजार लिटरच्या टॅंकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू आहे. १७ एप्रिलनंतर या भागांमध्ये दिवसाला पाच ते सहा टॅंकर जात होते. १ मेपासून त्यात मोठी वाढ झाली आहे. दिवसाला १० ते १५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. म्हणजे दरदिवशी एक लाख पाच हजार लिटर जादा पाणीपुरवठा पालिकेला करावा लागतो.
शहरात १७ एप्रिलपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. तेव्हा दिवसाला तीन ते पाच टॅंकर जात होते. मात्र, १ मेपासून पाण्याची मागणी वाढली. दिवसाला १० ते १५ टॅंकरची मागणी आहे. आतापर्यंत ३९१ फेऱ्या झाल्या.
- जितेंद्र विचारे, अग्निशमन विभागाचे अधिकारी
शहराला रोजच पाणीपुरवठा हवा. दिवसाआड पाणी पुरत नाही. भरपूर काटकसर करावी लागते. सुधारित पाणीयोजना झाल्यावर नियमित पाणीपुरवठा होणार, असे सांगितले होते; परंतु आज योजना होऊनही मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासते.
- गंगाधर नारायण मजगावकर, बेलबाग