
चिपळूण ः वाशिष्ठी नदीला मुबलक पाणी
पान २ साठी
वाशिष्ठी नदीत मुबलक पाणी
शहराची चिंता मिटली ; मचूळ पाण्याचा प्रश्नही निकाली
चिपळूण, ता. २९ ः वाशिष्ठी नदी उन्हाळ्यात तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे यावर्षी चिपळूण शहरातील मचूळ पाण्याचा विषय मिटला आहे. चिपळूण पालिका दररोज १४ लाख लिटर पाणी वाशिष्ठी नदीतून उचलून शहरातील नागरिकांची तहान भागवत आहे.
उन्हाळ्यात दरवर्षी चिपळूण शहराला पाणीटंचाई जाणवते. शहराच्या निम्म्या भागाला मचूळ पाण्याचा पुरवठा होतो. यावर्षी नदीला पुरेसा पाणी असल्यामुळे या दोन्ही समस्यांमधून पालिका मुक्त झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या पाणीविभागाचे निम्मे टेन्शन कमी झाला आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतरचे पाणी वाशिष्ठी नदीला सोडले जाते. हे पाणी पालिका जॅकवेलच्या माध्यमातून उचलते आणि शहरातील नागरिकांना पुरवते. वाशिष्ठी नदीचे पाणी उचलण्यासाठी खेर्डी आणि गोवळकोट या ठिकाणी पालिकेच्या जॅकवेल आहेत. कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती बंद असते तेव्हा वाशिष्ठी नदी कोरडी असते. कोयना प्रकल्पातील वीजनिर्मितीवर मर्यादा आल्यानंतर वाशिष्ठी नदी कोरडी पडते. त्यानंतर चिपळूण शहरात पाणीटंचाई निर्माण होते. गोवळकोट जॅकवेलमधून समुद्राचे खारे आणि मचूळ पाणी जॅकवेलच्या माध्यमातून नागरिकांना पुरवले जात होते.
यावर्षी उकाडा जास्त आहे त्यामुळे राज्यात विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे कोयना प्रकल्पातून अविरत वीजनिर्मिती सुरू आहे. कोयना धरणातील उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर वीजनिर्मितीसाठी केला जात आहे. त्याचा फायदा चिपळूण पालिकेच्या पाणी योजनेला झाला. पालिकेच्या दोन जॅकवेलमधून वाशिष्ठीचे पाणी उचलून पाच टाक्यांमध्ये साठवले जाते. तेथून ते शहराला पुरवठा केले जात आहे.
कोट
चिपळूण शहराला यावर्षी पूर्ण क्षमतेने पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यावर्षी वाशिष्ठी नदीला मुबलक प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईची समस्या नाही. मचूळ पाण्याचा प्रश्नही मिटला आहे. काही ठिकाणी कमी अधिक दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
- नागेश पेठे, पाणीपुरवठा विभागप्रमुख