
राजापूर-काजू उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या
फोटो ओळी
-rat३०p७.jpg ः P२३M०५८२३ राजापूर ः शेतकर्यांशी संवाद साधताना माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत.
-----------
काजू उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या
सदाभाऊ खोत ; वारी शेतकऱ्यांची पदयात्रा, १४० ते १४५ रुपये भाव मिळावा
राजापूर, ता. ३० ः प्रतिकूल आणि सातत्याने बदलणार्या हवामानाचा कोकणातील हापूस आंब्याच्या पिकासह काजूला फटका बसला. काजूचे उत्पन्न रोडावल्याने काजू उत्पादक शेतकरी आथिकदृष्ट्या नुकसानीच्या खाईत लोटला गेला आहे. कोकणातील शेतकर्यांच्या या प्रश्नाकडे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘वारी शेतकर्यांची’ या पदयात्रेच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे. यामध्ये कोकणातील काजू उत्पादक शेतकर्यांना १ लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी मिळण्यासह अन्य विविध प्रकारच्या मागण्या त्यांनी शासनाकडे केल्या आहेत.
राज्यातील शेतकर्यांशी संवाद साधताना त्यांच्या विविध समस्या आणि प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटना, सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र आणि ऊस वाहतूकदार संघटना यांनी ‘वारी शेतकर्यांची’ ही नुकतीच पदयात्रा काढली. या पदयात्रेमध्ये खोत आणि सहकार्यांनी शेतकर्यांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या आणि प्रश्न जाणून घेताना ते शासनदरबारी मांडून सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येण्याचे त्यांनी शेतकर्यांना आश्वासित केले. या पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी शासनाचे शेतकर्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्यांच्या या पदयात्रेची दखलही शासनाने घेताना शेतकर्यांचे जलदगतीने प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठक होणार आहे. दरम्यान, या माध्यमातून खोत यांनी राज्याच्या अन्य भागातील शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडताना कोकणातील शेतकर्यांच्या प्रश्नाकडेही शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यामध्ये त्यांनी कोकणातील काजू उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नाचा समावेश आहे.
काजू उत्पादक शेतकर्यांना एक लाखापर्यंत कर्जमाफी मिळावी, काजू बी शासनाच्या माध्यमातून संकलित केली जाताना या काजू बीला १४० ते १४५ रुपये किलो एवढा दर मिळावा, काजू उत्पादक शेतकर्यांसाठी कृषी, पणन व सहकार विभागाकडून फेब्रुवारी, २०२३ मध्ये काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.
चौकट
रिफायनरीमध्ये भागीदार करून घ्यावे
तालुक्यातील बारसू परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पविरोध आणि समर्थन आदी भूमिकांमधून गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे. अशा स्थितीमध्ये कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पामध्ये ज्या शेतकर्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत. त्या शेतकर्यांना रिफायनरी कंपनीमध्ये भागीदार (शेअर्स) करून घ्यावे, अशी भूमिका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मांडली आहे.