मुसळधार पावसाने रत्नागिरी बाजारपेठेत पाणीच पाणी

मुसळधार पावसाने रत्नागिरी बाजारपेठेत पाणीच पाणी

Published on

- rat३१p३४.jpg, rat३१p३५.jpg-
P२४N२२५१३
रत्नागिरी ः रामआळीतील बाजारपेठेत पावसामुळे साचलेले पाणी.
-----------

पावसाने रत्नागिरी बाजारपेठेत पाणीच पाणी

नागरिकांसह व्यापाऱ्यांची तारांबळ ; पालिकेच्या कारभारावर नाराजी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ ः दिवाळीच्या पूर्वसंध्येला पडलेल्या अर्ध्या तासाच्या मुसळधार पावसाने रत्नागिरी शहरातील रामआळी, राधाकृष्ण नाक्यातील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांसह व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे गटारातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे दिवाळी खरेदीसाठी बाजारात आलेल्या नागरिकांना त्यामधूनच वाट काढत जावे लागत होते. पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकही त्रस्त झाले होते. पालिकेच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत आहे. त्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
बुधवारी (ता. ३०) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले. ढगांच्या गडगडाटासह विजाही चमकू लागल्या. वेगवान वारे वाहू लागले आणि मुसळधार पावसाने रत्नागिरी शहराला झोडपून काढले. बाजारपेठेतील वीज पुरवठाही खंडीत झाला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला हजारो नागरिक खरेदीसाठी बाजारात आले होते. पावसामुळे त्यांची तारांबळ उडाली. अनेकांनी दुकानांच्या छताखाली आसरा घेतला. कपडे, खेळणी, रांगोळी, फळे असे विविध फिरते विक्रेतेही स्टॉल टाकून होते. पावसाने त्यांचे चांगलेच नुकसान केले. अचानक आलेल्या पावसामुळे रामआळीच्या उतारातून आलेले पाणी राधाकृष्ण नाका, मारूती आळी परिसरात तुंबून राहिले. गटारे तुंबली आणि सांडपाणी पावसाच्या वाहत्या पाण्यात मिसळून गेले. रस्त्यावर अर्धा फूट पाणी वाहत होते. त्या पाण्याचा उग्रट वास सगळीकडे पसरलेला होता. काही नागरिक त्या सांडपाण्यातून मार्गक्रमण करीत होते. पावसाचा जोर थांबला तरीही पाणी जैसे थे होते. अखेर तिथे असलेल्या काही फेरीवाल्यांनी गटाराच्या लाद्या काढून पाणी प्रवाहीत होण्यासाठी मार्ग करून दिला. त्यामुळे पंधरा मिनिटांनी साचलेले पाणी वाहून गेले. मात्र गटारातील कचरा रस्त्यावर पसरला होता. मोठ्या उत्साहाने खरेदीसाठी आलेल्या काही नागरिकांनी पावसामुळे माघारी जाणे पसंत केले.
दरम्यान, मोठ्या पावसात बाजारात पाणी साचण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यावर वेळीच मार्ग काढणे आवश्यक आहे. या प्रश्नाकडे पालिका प्रशासनाने गांभिर्याने पाहिले पाहिजे, अशी सूचना नागरिकांकडून केली जात आहे.
----
कोट
रामआळी बाजारपेठेतील गटारे खुपच जूनी आहेत. अरुंद असल्यामुळे ती बूजलेली आहेत. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. यावर उपाय म्हणून अस्तित्वात असलेली गटारे नुतनीकरण करण्याचा प्रस्ताव पालिकेने केला पाहिजे.
- सचिन करमरकर, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com