कोकणात मेंढपाळांच्या तांड्यांपुढे विसाव्याचा प्रश्न
rat2p5.jpg-
01914
संगमेश्वर- घाटावरून निघालेल्या मेंढ्या.
कोकणात मेंढपाळांच्या तांड्यांपुढे विसाव्याचा प्रश्न
दिवाळी संपली तरी पावसाचा धुमाकूळ; बिऱ्हाडं निघाली
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २ः अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दिवाळी संपली तरीही पावसाने उघडीप दिलेली नाही. परिणामी रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात भाताची कापणी आणि कापणीनंतरची कामे खोळंबलेली आहेत. त्यामुळे यंदा मेंढ्या कुठे बसवायच्या? असा प्रश्न घाटावरून कोकणात आलेल्या मेंढपाळांपुढे उभा राहिला आहे. दिवाळी संपल्यानंतर घाटावरून मेंढपाळांचे तांडे मोठ्यासंख्येने कोकणात उतरू लागतात. गेल्या काही दिवसात मेंढपाळांनी सुरूवातही केली आहे.
दरवर्षी दिवाळीनंतर घाटमाथ्यावरील मेंढपाळ मोठ्यासंख्येने कोकणात दाखल होत असतात. कोकणातील भात कापणी दिवाळीपूर्वी सुरू होत असते. मात्र यंदा परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यापाठोपाठ समुद्रात मोंथा वादळ उसळले. परिणामी पावसाचा मुक्काम वाढला आणि कोकणातील शेतकऱ्यांचे वेळापत्रक बिघडले. भाताची कापणी रखडल्याने पुढील सर्वच कामे खोळंबली. ऑक्टोबर महिना संपला तरी भाताचे पीक शेतात उभे असल्यामुळे मेंढपाळांची मोठी पंचाईत झाली आहे.
पावसाचा मुक्काम वाढल्यामुळे आपल्या मेंढ्या घेऊन पुन्हा माघारी जाणे मेंढपाळांना शक्य नाही. कोकणामध्ये आपल्या मेंढ्या घेऊन येताना मेंढपाळांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच भात कापणी झाली नसल्यामुळे मेंढ्यांना निवारा कुठे द्यायचा, या विचाराने मेंढपाळ चिंताग्रस्त झाले आहे. परतीच्या पावसाच्या भीतीने भात कापणी खोळंबली आहे. तोपर्यंत मेंढ्या कुठे बसविणार0 चाऱ्याचा प्रश्न जरी मार्गी लागत असला तरीसुद्धा निवाऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही.
घाटावरील मेंढपाळ आपले बिऱ्हाड घोड्यांच्या खांद्यावर टाकून कोकणाकडे येण्यास सुरुवात केली आहे. मात्र तुरळक ठिकाणी भात कापणी झाली असून मेंढ्या कुठे बसविणार? हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. शेतात भात उभे असल्याने माळरानावर आपला संसार थाटण्याची लगबग मेंढपाळांनी सुरू केली आहे. मात्र तेथे मोठ्याप्रमाणावर गवत असून विविध सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे त्यांच्यात भिती पसरली आहे. भातशेती कापली की शेतात मुबलक प्रमाणात जागा मिळते. त्यामुळे मेंढ्यांच्या निवाऱ्यासह अन्नांचा प्रश्न मार्गी लागत असतो. मात्र यंदा पावसाचा मुक्काम वाढल्यामुळे हे समीकरण कोलमडून पडले आहे.
चौकट
भातशेतीचे मोठे नुकसान
रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात भाताची कापणी सुरू झाल्यानंतर अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे कापून ठेवलेला भात शेतात भिजून गेला आहे. अनेक ठिकाणी भाताचा चिखल झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्यापही पाऊस उघडीप देण्याचे नाव घेत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

