‘नाणार’च्या उद्दिष्टाने काम नको - उदय सामंत

‘नाणार’च्या उद्दिष्टाने काम नको - उदय सामंत

रत्नागिरी - नाणारचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यात आणले आहे, असे उद्दिष्ट ठेवून जिल्हाधिकाऱ्यांनी काम करू नये, असा चिमटा काढत जिल्ह्याच्या विकासाला पूरक निर्णय घ्यावेत, असा सल्ला म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी दिला. तसेच विविध कार्यालयांना भेटी देण्याचा उपक्रम चांगला आहे; मात्र स्वतःच्या कार्यालयात दीड-दीड महिने प्रलंबित फायलिंगचाही निपटारा करण्याकडे लक्ष द्या, असा टोला त्यांनी हाणला.

शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, रत्नागिरी शहरातील विकासकामासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांकडून ३०८ खाली दाखल झालेल्या तक्रारीवरून ते कामच रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. निर्णय घेताना विकासकामाला अडथळा होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. हा निर्णय देण्यापूर्वी संबंधित प्रकरणाची फाईल दीड महिने प्रशासनाकडे पडून होती. त्याची दखल कुणीच घेतली नाही. जिल्हाधिकारी विविध कार्यालयांना भेटी देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेत आहेत. हे संगळं चांगले आहे, पण जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थितीकडेही त्यांनी पाहिले पाहिजे. धान्याचा पुरवठा का थांबला, याची कारणे न तपासताच स्थानिकांवर कारवाईचा बडगा उगारला गेला.

आम्हाला रोजगार द्या, अशी मागणी स्थानिकांनी मंत्री गिरीश महाजन आणि सचिवांपुढे केली. त्याचाच राग धरून कारवाया केल्या जात असून ही एकप्रकारे हीटलरशाही आहे. मारुती मंदिर येथील विकासासाठी सीएसआरमधून शंभर कोटी आणण्याचा प्रयत्न सुुरू आहे. ते करताना स्थानिक मंडळालाही विचारात घेतले पाहिजे. देवळाच्या पारंपरिकेतेला अडथळा येणार नाही, याची काळजी घेऊनच जिल्हा प्रशासनाने पावले उचलावीत, अशी सूचना केल्याचे सामंतांनी सांगितले.

बसणी सरपंचांवर दबावाखाली कारवाई
बसणी महिला सरपंचाने नळजोडणीला तयारी दर्शविली असतानाही प्रशासनाने त्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव पाठविला आहे. मुंबईतील व्यक्‍तीकडून खासगी जोडणीसाठी प्रस्ताव केला होता. त्याबरोबर अन्य बारा जणांचेही प्रस्ताव आहेत. सगळ्यांना एकत्र जोडणी देऊ असे सरपंचांनी सांगितले; मात्र कुणाच्यातरी दबावाखाली सरपंचावरच कारवाई होत आहे. याप्रकारे प्रशासन न्याय करत असल्याची खंत सामंत यांनी व्यक्‍त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com