`या` आंदोलनामुळे शिवसेनेचे नेते बिथरले, वेंगुर्ले भाजप तालुकाध्यक्षांचा पलटवार

Vengurle BJP Taluka President Comment On Balu Parab
Vengurle BJP Taluka President Comment On Balu Parab

वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग) - भाजपच्या आंगण ते रणांगण आंदोलनाला वाढता पाठिंबा बघून शिवसेना तालुकाप्रमुख बाळू परब बिथरले आहेत. ठाकरे सरकारच्या गलथान, भोंगळ कारभार विरोधात तालुक्‍यातील रेडीपासून परुळेपर्यंत जवळजवळ 73 बुथवर कार्यकर्त्यांनी आपल्या अंगणात तसेच सार्वजनिक ठिकाणी ठाकरे सरकारचा निषेध करत काळ्या फीती, काळे झेंडे, काळे कपडे व सरकारच्या विरोधातील फलक हातात घेऊन आंदोलने केली त्यामुळेच सैरभैर होऊन तालूका प्रमुखांनी या आंदोलनावर टिका केली आहे, असा पलटवार भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी केला आहे. 

श्री. गवंडळकर यांनी शिवसेनेचे बाळू परब यांच्या टीकेला आज उत्तर दिले. ते म्हणाले की, मुळात महाराष्ट्राची सत्ता मिळविण्यासाठी शिवसेनेने कोणाकोणाचे पाय धरले हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे भाजपा पक्षावर टीका करण्याचा अधिकार तालुकाप्रमुखांना नाही. मुळातच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठे झालेल्या तालुका प्रमुख बाळू परब यांची निष्ठा ही पक्षापेक्षा दीपक केसरकरांवर आहे हे तालुक्‍यातील निष्ठावान शिवसैनिकांना माहीत आहे. त्यामुळे यापुढे निष्ठेच्या गोष्टी त्यांनी शिकवू नये. नगराध्यक्ष राजन गिरप हे भाजपची अधिकृत कमळ निशाणी घेऊन शिवसेनेचा पराभव करुन निवडून आलेले आहेत. त्यामुळे पक्षाचा संबंध नाही, असे नगराध्यक्ष म्हणूच शकत नाहीत. ते सर्वसमावेशक असल्यामुळे सर्व राजकीय लोकप्रतिनिधींसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते पालकमंत्री काय, कुठल्याही लोकप्रतिनिधींसोबत काम करण्यासाठी तयार असतात. बाळू परब यांनी याबाबत माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांचे मार्गदर्शन घ्यावे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना पालकमंत्री म्हणून असलेले केसरकर हे जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे निधीसाठी जात होते. व त्यामुळेच त्या सरकारच्या काळात सिंधुदुर्गात भरघोस निधी आला. मागची पाच वर्षे शिवसेनेच्या आरोग्यमंत्र्यांमुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्याच्या बाबतीत वाताहत झाली आहे. तुम्ही निवडून आलेल्या पंचायत समिती मतदार संघात साधी सॅनिटायझर मशिन नाही की टेंम्परेचर गन नाही ती आधी उपलब्ध करा आणि मगच टिका करा, असे ते म्हणाले. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेल्या सलोख्याच्या संबंधाचाही फटका केसरकरांना बसला व त्यामुळेच त्यांना ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान मिळू शकले नाही आणि कोण कोणाचे बोट धरुन मोठे होत नसते तर ज्यांच्यात धमक व कुवत असते तेच मोठे होतात. आज भाजप पक्ष राज्यात सर्वाधिक पक्षाची कमळ ही निशाणी घेऊन निवडून आलेल्या अमदारांचा पक्ष आहे. त्यामुळे वरिष्ठांना खुश करण्यासाठी टिका करु नका. 
- सुहास गवंडळकर, भाजप तालुकाध्यक्ष 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com