उभादांडा येथे १६ मे पासून महोत्सव

उभादांडा येथे १६ मे पासून महोत्सव

वेंगुर्ले - कोकणातील आरोग्यदायी फळांच्या प्रचारासाठी, तसेच तालुक्‍यात कृषी पर्यटन होम स्टे व सुसंस्कृत पर्यटनाला चालना देण्यासाठी उभादांडा सागरेश्‍वर किनाऱ्यावर १६ ते १९ मे या कालावधीत वेंगुर्ले फळ व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले आहे.

‘सागरेश्‍वर महोत्सव वेंगुर्ले २०१७’ या नावाने हा महोत्सव सिंधुदुर्ग जिल्हा ऑरगॅनिक फेडरेशन, कृषी विभाग, प्रादेशिक फळसंशोधन केंद्र वेंगुर्ले, जागृती मंडळ वेंगुर्ले, लुपिन फाउंडेशन, वेंगुर्ले तालुका व्यापारी संघ, मानसीश्‍वर पर्यटन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सागरेश्‍वर किनाऱ्यावर होणार आहे. याच्या नियोजनासाठी उभादांडा येथील दर्याराजा रिसॉर्ट येथे आज सिंधुदुर्ग जिल्हा ऑरगॅनिक फेडरेशनचे अध्यक्ष बाळू परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी कृषी विभागाचे प्रकल्प संचालक तानाजी पावडे, तालुका कृषी अधिकारी विनय साखरे, जागृती मंडळाचे अध्यक्ष संजय मालवणकर, कोकण कृषी विद्यापीठाचे मत्स्य वैज्ञानिक डॉ. नितीन सावंत, वेंगुर्ले प्रादेशिक फळसंशोधन केंद्राचे डॉ. बी. एन. सावंत, लुपिन फाउंडेशनचे संतोष कुडतरकर, सिंधुसागर पर्यटन संस्थेचे वासुदेव ऊर्फ भाई देवूलकर, सिंधुदुर्ग पर्यटन संस्थेचे सचिव दीनानाथ बांदेकर, वेंगुर्ले व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, मानसीश्‍वर पर्यटन संस्थेचे गणपत केळुसकर, प्रकाश मोरे, कृषी पर्यवेक्षक विजय घोंगे, क्षेत्र सल्लागार नीतेश मयेकर, कृषी सहायक धनंजय गावडे, अमेय घोसाळकर, प्रशांत राणे, संदीप परुळेकर, ज्ञानदेव भूते, सौमित्र परुळेकर आदी उपस्थित होते.

यात सागरेश्‍वर मंदिराच्या समोरील सुरुच्या बागेत स्टॉल उभारण्यात येणार आहेत. कृषी विभाग, फळ संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठ, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, फळ विक्रेते, फळप्रक्रिया उद्योजक, तसेच खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल असणार आहेत. मालवणी खाद्यपदार्थ हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे. या महोत्सवात चायनीज खाद्यपदार्थांना विक्रीस बंदी असणार आहे. या स्टॉलमध्ये स्थानिक फळांबरोबरच स्थानिक धान्ये व मिरची विक्री यांचेही स्टॉल असणार आहेत. सागरेश्‍वर किनाऱ्यावर भव्य स्टेज उभारण्यात येणार असून, त्या ठिकाणी १६ ते १९ मे या कालावधीत दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० पर्यंत स्थानिक कलाकारांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्याठिकाणीही मालवणी खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. महोत्सवाच्या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत विविध तज्ज्ञ व्यक्तींची मार्गदर्शन चर्चासत्रं होणार आहेत.
महोत्सवाच्या प्रचारासाठी १५ मे ला सायंकाळी वेंगुर्ले हॉस्पिटलनाका ते सागरेश्‍वर मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. महोत्सवात विविध फळांच्या प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. फळांवर प्रक्रिया केलेल्या पदार्थांना बाजारपेठ उपलब्धतेविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी तालुक्‍यातील विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट, शैक्षणिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांचेही सहकार्य घेण्याचे ठरले.

बीच स्पर्धांसह वाळू शिल्पाचे आकर्षण
सागरेश्‍वर महोत्सवांतर्गत १६ ते १९ मे या कालावधीत सायंकाळी ४ ते ७ या वेळेत कबड्डी, व्हॉलिबॉल, दौड या बीच स्पर्धा व वाळू शिल्प स्पर्धा घेण्यात येणार आहेत. शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या चित्ररथ व वैयक्तिक वेशभूषेंनाही बक्षिसे ठेवण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com