रत्नागिरी - कणकवली विधानसभा निवडणुकीबाबत व्यक्तीवरून रामायण सुरू आहे. पक्षाचे कुठेही भांडण नाही, व्यक्तीसाठी हा विरोध आहे. सेना बाकी कुठेही तडजोड करेल पण नारायण राणे आणि छगन भुजबळांबाबत तडजोड करणार नाही. बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. त्यांना नको नको ते बोलले. त्यामुळे राणेंना माफी नाही, अशा शब्दात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी राणेंवर आगपाखड केली.
पाली (ता. रत्नागिरी) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ""राज्यातील 288 पैकी असे एखाद्या ठिकाणी होते. ते कणकवली येथे होत आहे. मैत्रीपूर्ण लढत म्हटली जाते. परंतु आम्ही सतीश सावंत यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. तेथे पक्षांचे भांडण नाही, तर व्यक्तीवरून रामायण घडत आहे. नारायण राणे या व्यक्तीसाठी हा विरोध आहे. बाकी कुठेही तडजोड करू, पण राणे आणि भुजबळांबाबतीत कुठेही तडजोड केली जाणार नाही. राणेंना शिवसैनिक माफ करायला तयार नाहीत. आमचे दैवत असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल राणे नको-नको ते बोलले. त्यामुळे राणेंना माफी नाही. कणकवलीत सेनेचे सतीश सावंत विजयी होणारच आहेत.
सर्वच जागा निवडून येतील
राज्यात विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या हाती काही लागणार नाही. त्यांचे तुकडे-तुकडे झाले आहेत. विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही. विरोधी पक्ष नेतेपद मिळेल, एवढा आकडाही येईल असे वाटत नाही. कोकणात शिवसेनेच्या सर्वच जागा निवडून येतील, असे सकारात्मक वातावरण आहे. अनेक उमेदवार पूर्वीपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील, असे देसाई यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.