Vidhan Sabha 2019 : गुहागरची जागा भाजपला हवी

Vidhan Sabha 2019 : गुहागरची जागा भाजपला हवी

गुहागर - जनसंघापासून गुहागर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भारतीय जनता पक्षाने केले आहे. त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत गुहागरची जागा युतीच्या जागा वाटपात भाजपलाच मिळाली पाहिजे, अशी मागणी प्रदेश चिटणीस व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी पत्रकार परिषदेत केली. ही मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने लावून धरली आहे, डॉ. नातू यांनी स्पष्ट केले. 

सोमवारी (ता. 9) दुपारी चिपळूणमध्ये आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेतर्फे गुहागरातून निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर तातडीने पत्रकार परिषद घेऊन डॉ. नातूंनी गुहागरच्या जागेवर भाजपचाच हक्क असल्याचे स्पष्ट केले.

नातू म्हणाले की, 2009 च्या निवडणुकीपूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना झाली. यामध्ये शिवसेनेनेच आमदार व तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा मतदारसंघ दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघात विभागला गेला. युतीच्या जागावाटपात अखेरच्या क्षणाला विरोधी पक्षनेत्याला मतदारसंघ हवा असा आग्रह शिवसेनेकडून धरला गेला. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीत गुहागरचा मतदारसंघ भाजपने शिवसेनेला दिला. त्यावेळी जे घडले ते सर्वश्रुत आहे. त्यानंतर रामदास कदम आणि मी एकत्र गुहागरात फिरलो. युतीमधील कटुता नाहीशी केली. 2014 च्या निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या गेल्या. त्यापूर्वी जनसंघापासून गुहागर मतदारसंघातून भाजपच प्रतिनिधित्व करत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 5 जागांपैकी 3 जागांवर शिवसेनेचेच आमदार आहेत. राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या खेड दापोली मंडणगड मतदारसंघात शिवसेनेने उमेदवारही निश्‍चित केला आहे. जिल्ह्यातील एक मतदारसंघ तरी भाजपला मिळाला पाहिजे ही पक्षाची  भूमिका आहे. अशावेळी सहजगत्या जागा वाटपात मिळू शकते अशी जागा गुहागरची आहे. त्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात भाजपलाच मिळाला पाहिजे अशी भूमिका पक्षाने आधीपासूनच घेतली आहे. जागावाटपाचे अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. 

गणेशोत्सवापूर्वी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेली कामे पूर्ण केली आहेत. बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही त्याचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा जिल्ह्यात 16 व 17 सप्टेंबरला आहे. त्या यात्रेच्या यशस्वितेसाठी सध्या कार्यकर्ते काम करत आहे. त्यानंतर पक्षाच्या सूचनेप्रमाणे युती म्हणून कार्यकर्ते काम सुरू करतील. असेही त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला तालुका सरचिटणीस नीलेश सुर्वे, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत महाजन, भाजपचे नगरसेवक उमेश भोसले, गजानन वेल्हाळ, समीर घाणेकर, भाग्यलक्ष्मी कानडे, ज्योती परचुरे आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com