कौशल्य विकास प्रशिक्षणाचे राज्यातील पहिले केंद्र पालीत

कौशल्य विकास प्रशिक्षणाचे राज्यातील पहिले केंद्र पालीत

विनायक राऊत ः ठाकरे, रूडी यांच्या हस्ते 20 ला प्रारंभ

रत्नागिरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रशिक्षण केंद्र तालुक्‍यातील पाली येथे डी. जे. सामंत महाविद्यालयात सुरू होणार आहे. प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे. केंद्राच्या उद्‌घाटनासाठी 20 डिसेंबरला सकाळी अकरा वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातले हे पहिले प्रशिक्षण केंद्र आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

श्री. राऊत म्हणाले, ""कौशल्य विकास कार्यक्रमात प्रशिक्षण देण्यासाठी वीस संस्थांची नेमणूक केली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी कोहिनूर टेक्‍निकल इन्स्टिट्यूटची नेमणूक आहे. प्रशिक्षित उमेदवारांपैकी पन्नास टक्के जणांना स्वयंरोजगार, रोजगार संधी उपलब्ध करून दिल्याशिवाय एजन्सीला निधी मिळणार नाही. एक हजार क्षमतेच्या या केंद्रात सुरवातीला इलेक्‍ट्रिकल, ऑटोमोबाइल, एसी-रेफ्रिजरेटर दुरुस्ती, मोबाइल दुरुस्ती, फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर आदी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाईल. काही अभ्यासक्रमांना व्हर्च्युअल शिक्षण दिले जाणार आहे. टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रमांची संख्या वाढवण्यात येणार आहे.''

ते म्हणाले, ""सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार व कौशल्य विकासाद्वारे स्वयंरोजगार नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. तीन महिने ते एक वर्ष कालावधीचे सात अभ्यासक्रम येथे शिकवण्यात येणार आहेत. या अभ्यासक्रमांना कोणतेही शुल्क नाही. सर्व खर्च केंद्र सरकार करणार आहे. दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी पास सवलत मिळावी, अशी मागणी अधिवेशनात आमदार उदय सामंत करणार आहेत. कोकणच्या भौगोलिक दृष्टीने व उद्योगधंदे पाहून त्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाईल.''

या वेळी संपर्कमंत्री विजय कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, आमदार उदय सामंत यांच्यासह नूतन नगरसेवक उपस्थित होते.

आयटीआयची दारुण स्थिती
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची स्थिती बिकट आहे. परीक्षांचा निकाल लागलेला नाही, अपुरा कर्मचारीवर्ग, गैरसोयी यामुळे या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. अशा वेळी नव्याने कौशल्य विकास कार्यक्रम राबवला जातोय. या संदर्भात राऊत यांनी सांगितले, ही स्थिती खरी आहे. मागील दौऱ्या वेळी मी यात लक्ष घातले आहे. विद्यार्थ्यांचे निकाल लागत आहेत. केंद्राचे अभ्यासक्रम असले, तरी राज्य शासन अंमलबजावणी करते. त्यामुळे त्यातील गैरसोयी दूर करून शिक्षकांची भरती करणे गरजेचे आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com