सावंतवाडी : उमेश यादव यांची आत्महत्या राजकीय षड्यंत्रातूनच झाली आहे. मालवण-कणकवलीमध्ये सुरू असलेले असे प्रकार आता सावंतवाडीत आले आहेत. त्यामुळे या प्रकाराची चौकशी योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी हा तपास सीआयडीकडे देण्यात यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. निवडणुकीतील पैशाच्या देवाण-घेवाणीतूनच यादव यांनी आपले जीवन संपवले, असा आरोप करून या प्रकरणात जे दोषी सापडतील, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचीही आपण मागणी करणार असल्याची माहिती येथे खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
हे पण वाचा - आरे - वारे किनाऱ्याचा पर्यटन विकास अडकला कशात ?
या वेळी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, अण्णा केसरकर, नगरसेविका अनारोजीन लोबो, अशोक दळवी, माधुरी वाडकर, शब्बीर मणियार, भारती मोरे, अपर्णा कोठावळे, उमेश कोरगावकर, चंद्रकांत कासार उपस्थित होते. श्री. राऊत म्हणाले, ""यादव यांचा राजकारणातल्या विकृतीने घेतलेला बळी असून कणकवली, मालवण या ठिकाणी या आधीच राजकीय विकृतीतून बळी गेले आहेत. ही विकृती सावंतवाडीत आता सुरू होत आहे. हे येथेच थांबण्याची गरज आहे. यासाठी या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.''
हे पण वाचा - मटण दरवाढीमागे हे आहे कारण
ते म्हणाले, ""ही त्यांची आत्महत्या असली तरी त्यामागे एक षड्यंत्र आहे. त्यामुळे या प्रकरणात संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. तपास अगदी खोलवर जाऊन योग्य पद्धतीने व्हावा, यासाठी हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याची मागणी मी केली आहे. आज आम्ही त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची हेळसांड होणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे शिवसेना खंबीर उभी आहे.''
हे पण वाचा - भाऊ खालू बाजा म्हणजे काय रे.. ?
या वेळी आत्महत्या प्रकरणातील चिठ्ठी बद्दल विचारले असता ते म्हणाले, ""चिठ्ठीबद्दल अद्यापही कुठली माहिती मिळाली नाही. त्यांचा मृत्यू हा दुसऱ्याने दिलेल्या त्रासातून झाला आहे. या प्रकरणाबाबत मी पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्याशीही बोलणार आहे. पडद्यामागे काहीही लपून राहत नाही. तपासातून सर्व काही बाहेर येईल. यादव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यावर त्यांची मनस्थिती पाहता काही ते बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्ह्यातील काही राजकीय परिस्थितींची कल्पना आहेत. पूर्वीसारखी पापे येथे घडू देणार नाही. ज्यांच्या आहुत्या गेल्या आहेत, त्याचा विचार करता यातील दोषींना स्वस्थ बसू देणार नाही.''
केसरकर यांना मंत्रिपद न मिळाल्याबद्दलच्या प्रश्नावर ते म्हणाले, ""सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याचे मंत्री सर्वात कर्तृत्ववान आहेत. दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा योजना यशस्वीरित्या राबविली. त्यांनी 180 कोटींचा निधीही या माध्यमातून आणला आहे. त्यांनी केलेली विकासकामे ही प्रत्येकाला माहीत आहेत. वैभव नाईक, दीपक केसरकर यांनी अनेक विकासकामे लोकांपर्यंत पोचवली आहेत. त्यांच्या कामाबद्दल प्रश्नच नाही. मुंबईसाठी यावेळी मंत्र्यांची नावे यावेळी मंत्रिमंडळात आली. गेल्यावेळी रत्नागिरीला कुठलं मंत्रिपद दिलं नव्हतं. त्यामुळे यावेळी रत्नागिरीला मंत्रिपद देण्यात आले आहे. यावेळेला सिंधुदुर्गसाठी मंत्रिपद दिलं नसलं तरी पुढच्या वेळी सिंधुदुर्गाचा विचार मंत्रिपदासाठी नक्कीच केला जाईल.''
ते म्हणाले, ""केसरकर यांनी चांदा ते बांदा योजना यशस्वीरित्या सिंधुदुर्गमध्ये राबविण्याचे काम केले आहे. चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अनेकांना त्याचा लाभ झाला आहे. याचा विचार करून खासदार या नात्याने आता मी कोकणातील रत्नागिरी आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यातही चांदा ते बांदा योजनेचा समावेश करून घ्यावा, अशी मागणी करणार आहे. या जिल्ह्यात चांदा ते बांदा योजनेतील व्यवस्थापक टीममध्ये शेतकरी, बागायतदार, महिला बचतगटाचा प्रतिनिधी, तरुण युवा शेतकरी प्रतिनिधी यांचा समावेश करून घेणार आहे.''
ठाकरे पालकमंत्री झाल्यास आनंद
श्री. राऊत म्हणाले, ""सावंतवाडी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत मिळवलेला हा विजय म्हणजे धनशक्तीचा विजय आहे. आदित्य ठाकरे सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाले तर आम्हाला आनंदच आहे. ठाकरे यांना सिंधुदुर्ग-रत्नागिरीबद्दल खूप आपुलकी आहे. या वेळी अधिवेशनात त्यांनी रस्ता विकासासाठी तरतूद करा, अशी मागणी केली आहे.''
राणे हा विषय आमच्यासाठी संपला
राणेंबद्दल प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ""राणेंना स्वतःच असं कर्तृत्व नाही. त्यांना स्वतःच कर्तृत्व असत तर त्यांना भाजपचा आधार घ्यावा लागला असता का? त्यांना कोणताही आधार नाही म्हणूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राणेंच्या विषयावर जास्त बोलण्यात आम्ही वेळ घालवत नाही. राणे हा विषय आमच्यासाठी संपलेला विषय आहे.''
|