धनगरवाड्यांवर पाणीटंचाईने आलीय स्थलांतराची वेळ

धनगरवाड्यांवर पाणीटंचाईने आलीय स्थलांतराची वेळ

खेड - गेल्या काही दिवसांत पारा कमालीचा चढला आहे. पाणीटंचाईचा प्रश्‍न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. सद्यःस्थितीत तालुक्‍यातील २० गावे व ३३ वाड्या पाणीटंचाईच्या वणव्यात होरपळून निघत आहेत. धनगरवाड्यांची अवस्था सर्वाधिक भीषण आहे. काही जणांवर स्थलांतराची वेळ आली आहे. घशाला पडलेली कोरड शमवायची कशी या विवंचनेने टंचाईग्रस्तांना ग्रासले आहे. २ शासकीय आणि २ खासगी अशा ४ टॅंकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने पाणीपुरवठयाचे नियोजन पुरते कोलमडून गेले आहे. सह्याद्रीच्या कड्याकपारीत वसलेलेल्या धनगरवाड्यांना पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसतो आहे.  पाण्याचे सारेच स्रोत कोरडे झाल्याने धनगरवाड्यांची अवस्था अधिक बिकट झाली आहे. पाण्यावाचून पाळीव जनावरांची होत असलेली तडफड पाहताना काळजाला पीळ पडत आहे. माणसांनाच प्यायला पाणी नाही तिथे जनावरांना कुठून आणायचे असा प्रश्‍न आहे.  त्यामुळे काही वाड्यांवर स्थलांतराची वेळ आली आहे. निवडणुका आल्या की, धनगरवाड्यांचा पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या घोषणा केल्या जातात. परंतु, प्रत्यक्षात तसे काहीच घडतच नाही. 

पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. काही वाड्या अशा दुर्गम भागात वसल्या आहेत की, तिथे पाण्याचा टॅंकरदेखील पोचत नाही. त्यामुळे अशा वाड्यांतील ग्रामस्थांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. टंचाईग्रस्त ग्रामस्थांच्या घशाला पडलेली कोरड शमविण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे. परंतु, टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या दिवसेंदिवस  वाढतच चालल्याने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पुरते कोलमडून गेल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com