मतलई वाऱ्यांनी थंडीची चाहूल 

मतलई वाऱ्यांनी थंडीची चाहूल 

रत्नागिरी - कडाक्‍याच्या उन्हाबरोबर अचानक सुरू झालेल्या मतलई वाऱ्यांनी कोकणात थंडी जाणवू लागली आहे. या बदलाने आंबा बागायतदार सुखावले आहेत. हवेतील वातावरण पंधरा दिवस असेच स्थिर राहीले तर मोहोर लवकर येईल, अशी आशा व्यक्‍त केली जात आहे. 

सप्टेंबरच्या अखेरीस परतीच्या पावसाचे ढोल वाजले. जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात पावसाचा जोर होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात केवळ 200 मिमी पाऊस झाला. या काळात उन्हाचा तापही वाढलेला होता. पारा 36 अंश सेल्सिअपर्यंत चढलेला होता. किमान पाराही 23 ते 24 अंश सेल्सिअसपर्यंत होता. या परिस्थितीत आंबा कलमांना नव्याने पालवी फुटू लागल्याने बागायतदार धास्तावले होते. सर्वांनाच थंडीची प्रतीक्षा होती. 

रविवारी (ता. 28) रात्रीपासून मतलई वारे वाहू लागल्यामुळे पहाटेच्या सुमारास वातावरण गार झाले होते. पाराही एक ते दोन अंशानी घसरला होता. सकाळच्या सत्रातील गार हवेने आंबा बागायतदार सुखावले. थंडीचा जोर वाढत राहीला तर कलमांना मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होईल. आता हे प्रमाण अगदीच कमी आहे; परंतु त्यातून फेब्रुवारी-मार्चमध्ये उत्पादन मिळण्याची शक्‍यता आहे. या वाऱ्याचा तेवढा परिणाम मच्छीमारीवर झालेला नाही. 

दाट धुक्‍याचा त्रास 

गेले काही दिवस जिल्ह्यातील बहुतांश घाटात मोठ्या प्रमाणात धुके होते. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. आता धुक्‍याबरोबरच गारव्याची जाणीव होऊ लागली आहे. 

मतलई वारे वाहू लागल्यामुळे थंडी जाणवू लागली आहे. वातावरणातील बदलाने कलमे लवकर मोहोरतील; मात्र पुढील काळात अवकाळी पावसाने गोंधळ घातला तर पंचाईत होऊ शकते.
- तुकाराम घवाळी,
बागायतदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com