रत्नागिरी : जगातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र रत्नागिरीत उभारण्यात येणार आहे. सुमारे 15 कोटीचा हा प्रकल्प आयटीआय येथील जागेत उभारण्यात येणार आहे. नागपूरच्या रामटेक संस्कृत विश्वविद्यालयाच्या चार केंद्रांपैकी रत्नागिरीत एक , स्पर्धा परीक्षा केंद्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र, लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र, इंजिनिअरिंग कॉलेज, सागरी विद्यापीठ अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था उभारून रत्नागिरी एज्युकेशन हब करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी रामटेकचे कुलगुरू, निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, नागपूरच्या रामटेक संस्कृत विश्वविद्यालयाची चार केंद्र महाराष्ट्रत करण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला. त्यातील पहिले केंद्र रत्नागिरी शहरात होईल. त्यानंतर पुणे, औरंगाबाद आणि नांदेडला ही केंद्र होणार आहेत. या केंद्रांमध्ये सर्व भाषांवर रिसर्च केला जाणार आहे. शहरातील एसटी बसस्थानकासमोरील महिला विद्यालयामधील 20 हजार स्क्वेअरफूट जागा ताब्यात मिळणार आहे. नागपूरच्या बाहेर पहिले केंद्र रत्नागिरीत होत आहे. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे सेंटर नाशिक आहे. मात्र पहिले उपकेंद्र 2 एकर जागेवर रत्नागिरी होणार आहे.
रत्नागिरीत उभारण्यात येणार्या जगातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रात शिवाजी महाराजांविषयी सर्व पुस्तके उपलब्ध असतील. छत्रपतींवर संशोधन करण्यासाठी रत्नागिरीत यावे लागेल, अशा दर्जाचे हे केंद्र असेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड येथे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केली जाणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात ते सुरू होईल. याचा सर्व्हे झाला असून दोन्ही जिल्ह्यातील सुमारे 5 हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल.
लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र तसेच पॉलिटेक्निक कॉलेजचा सुमारे 25 कोटीचा हा मोठा प्रकल्प आहे. 10 कोटी रुपये खर्च करून इंजिनिअरिंग कॉलेज देखील सुरू केले जाणार आहे. सागरी विद्यापीठासाठी दोन सदस्यीय समिती काम करत आहे. या सर्व उपक्रमामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जिल्हा मोठी भरारी घेणार आहे. यातून रोजगार, उद्योग निर्माण होऊन जिल्ह्याचा आर्थिक विकास साधला जाणार आहे.
सामंतांचे कौतुक
संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी केंद्रासाठी शासनाने पहिल्यांदा चांगले पाऊल उचलले. त्यासाठी उदय सामंत यांना आम्ही धन्यवाद देतो. गेली आठ वर्षे हा प्रयत्न सुरू होता. त्यांनी एका बैठकीत तो सोडविला, असे कौतुक रामटेक विश्वविद्यालयाच्या कुलगुरू यांनी केले.
संपादन- अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.