जि. प. मध्ये ४६ टक्के कर्मचारी तणावग्रस्त ; तणावमुक्तीसाठी पायलट प्रकल्प

अतिरिक्त काम; तणावमुक्तीसाठी पायलट प्रकल्प, प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
Zilla Parishad 46 percent employees stressed Pilot project stress relief ratnagiri
Zilla Parishad 46 percent employees stressed Pilot project stress relief ratnagiri sakal

रत्नागिरी : अतिरिक्त कामाचा भार आणि रिक्त पदे यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील साठपैकी ४६ टक्के कर्मचारी तणावग्रस्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बहुसंख्य कर्मचारी मानदुखीने त्रस्त आहेत. त्यांना तणावमुक्त करण्यासाठी प्रभारी शिक्षणाधिकारी डॉ. गजानन पाटील यांनी वैयक्तिक संवाद साधत, मार्गदर्शन करण्यास सुरवात केली आहे. तणावमुक्तीचा हा पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यास तो राज्यस्तरावर सादर केला जाणार आहे.

प्रभारी शिक्षणाधिकारी पदावर नियुक्त झालेल्या डाएट प्राचार्य डॉ. पाटील यांनी कार्यालयीन कर्मचारी ताण, तणावमुक्त कार्यशाळेचे आयोजन येथील जिल्हा परिषद सभागृहात केले होते. त्यामध्ये शिक्षण विभागातील साठहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. कामाच्या अतिरिक्त भारामुळे मानदुखी, डोकेदुखीसारखे आजार होत आहेत. सांधेदुखी, उच्च रक्तदाब, शुगरसह एक कर्मचारी कर्करोगग्रस्तही आहे. काही कर्मचाऱ्‍यांना झोप न येण्याचा आजारही जडला आहे. त्यांच्या तणावाचे स्वरूप लक्षात घेऊन कर्मचाऱ्‍यांवर उपाययोजना केल्या जाणार आहेत.

त्याचा प्रभाव किती झाला, याचे मूल्यमापन एक महिन्यानंतर केल जाईल. हा प्रयोग यशस्वी झाला तर जिल्हा परिषदेच्या अन्य सर्व विभागात राबविण्यात येईल. तसेच त्याचे राज्यस्तरावरही प्रेझेंटेशन करण्यात येणार आहे. ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्यापुढे मांडल्यानंतर त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच कार्यशाळेवेळी उपस्थित राहून ताण-तणाव कमी करण्यासाठी कर्मचाऱ्‍यांना मार्गदर्शन केले.

मानसिकतेवर परिणाम

कर्मचारी दिवसभर कार्यालयात काम करत असतात. घरी गेल्यानंतर रात्री आठ वाजल्यानंतर एखादेवेळी अधिकाऱ्‍याकडून फाईल्सची माहिती विचारली जाते. त्याचा कर्मचाऱ्‍याच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे पुढे आले. त्यासाठी रात्री आठनंतर कामाबाबत विचारणा करायची नाही, असा दंडक घालणे आवश्यक आहे.

मानसिक, शारीरिक व्याधीमुळे त्रस्त

दरम्यान, कर्मचारी व्याधीग्रस्त आहेत का, तणाव निर्माण होण्याची कारणे जाणून घेण्यासाठी प्रश्‍नावली तयार केली होती. त्याची लिंक कार्यशाळेप्रसंगी संबंधित कर्मचाऱ्‍यांकडून भरून घेण्यात आली. यामध्ये शिक्षण विभागातील रिक्त पदांमुळे कामाचा भार दिवसेंदिवस वाढत आहे. अतिरिक्त कामाचा भार सोपवण्यात येत असल्यामुळे एक संपेपर्यंत दुसरे काम सोपवण्यात येते. काहीवेळा पहिले काम अपूर्ण राहते. वरिष्ठ अधिकारीही समजून घेत नाहीत, अशी कारणे पुढे आली आहेत. ती माहिती गोपनीय ठेवण्यात आली असून त्या-त्या कर्मचाऱ्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी डॉ. पाटील वैयक्तिक संवाद साधणार आहेत. एकूण कर्मचाऱ्‍यांपैकी ४६ टक्के तणावाखाली काम करत आहेत. कुणी मानसिक तर कुणी शारीरिक व्याधीमुळे त्रस्त आहेत.

अनेक कर्मचारी मानसिकरीत्या त्रस्त असल्यामुळे कारभार चालवणे शक्य होत नाही. कामे न झाल्यामुळे अधिकाऱ्‍यांच्या टेबलवर फाईल्स वाढतात. हे सुरळीत चालवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थित असणे आवश्यक आहे. त्यासाठी कर्मचाऱ्‍यांना तणावमुक्त करण्यावर भर दिला जात आहे.

- डॉ. गजानन पाटील, प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com