आठवडाभरात राजकीय भूकंप - जयेंद्र रावराणे

आठवडाभरात राजकीय भूकंप - जयेंद्र रावराणे

वैभववाडी - तालुक्‍यात युतीची बोलणी सकारात्मक पद्धतीने सुरू आहेत. येत्या निवडणुकीत युतीच्या माध्यमातून सक्षम उमेदवार देण्यात येणार आहेत. विविध पक्षांचे अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या संपर्कात आहेत. येत्या आठवडाभरात राजकीय भूकंप घडविणार असल्याचे संकेत कणकवली विधानसभा प्रमुख जयेंद्र रावराणे यांनी येथे दिले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील श्री. रावराणे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. या वेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, माजी तालुकाप्रमुख अशोक रावराणे, संभाजी रावराणे, अनिल नराम, दीपक पाचकुडे आदी उपस्थित होते.

श्री. रावराणे म्हणाले, ‘‘येत्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार आहे. त्या दृष्टीने सकारात्मक चर्चा सुरू आहे. कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळावा यावरून युतीत अजिबात मतभेद होणार नाहीत. प्रत्येक मतदारसंघातून सक्षम उमेदवार उभे करण्यावर सर्वांचे एकमत झाले आहे. तूर्तास शिवसेनेकडे तालुक्‍यातील सर्व जागांसाठी उमेदवार उपलब्ध आहेत. गावागावात शिवसेनेची लोकप्रियता वाढत असून लोकांचा शिवसेनेकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे विविध पक्षांचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. यात एक जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती, पाच सरपंच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

त्यामुळे येत्या आठवडाभरात राजकीय भूकंप घडविणार आहे.’’ 
ते म्हणाले, ‘‘गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तालुक्‍यातील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. त्याचा फायदा येत्या निवडणुकीत आम्हाला होणार आहे; मात्र तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी विकासकामांसाठी दिलेला निधी कुठे गायब झाला तो आम्ही या निवडणुकीत शोधणार आहोत. ठेकेदार पुढाऱ्यांना या निवडणुकीत रोखण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. बेनामी ठेकेदारी रोखण्याकरिता जे जे करायचे ते आम्ही या निवडणुकीत करणार आहोत.’’ 

जिल्हा परिषद सदस्य स्नेहलता चोरगे यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाविषयी विचारले असता श्री. रावराणे यांनी दुसऱ्या पक्षात पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाचे अधिकार आपल्याला नाहीत. ते अधिकार खासदार विनायक राऊत यांच्याकडे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. तालुक्‍यात शिवसेना- भाजपची सत्ता आणणे हेच धोरण आमचे आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक युती करून लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 

तालुक्‍यात सेनेची ताकद जास्त
तालुक्‍यात भाजपपेक्षा शिवसेनेची ताकद अधिक आहे हे खरे आहे; मात्र या निवडणुकीत युती व्हावी याकरिता आम्ही सर्व आग्रही आहोत. ही निवडणूक युतीने जिंकण्याचा आम्ही चंग बांधला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com