जिल्ह्यात शिवसेनेला वर्चस्व राखण्याचे आव्हान

जिल्ह्यात शिवसेनेला वर्चस्व राखण्याचे आव्हान

सावंतवाडी - आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील यश राखण्याचे आव्हान शिवसेनेपुढे राहणार आहे. दुसरीकडे त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपला आवरण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे या सर्व परिस्थितीत जिल्ह्यातील एकहाती सत्ता पुन्हा राखण्यासाठी शिवसेनेचे नेते यशस्वी होतात की नाहीत, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. प्राथमिक टप्प्यात सत्ताधाऱ्यांना म्हणजेच काँग्रेसला सत्तास्थानापासून बाजूला ठेवण्यासाठी शिवसेना-भाजप युती करून लढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पालिका निवडणुकीत युतीची चर्चा फिस्कटल्याने त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला. त्याचबरोबर काँग्रेसला पुन्हा एकदा जास्तीच्या जागा मिळवता आल्या. त्यामुळे आता काही झाले तरी युती करावीच या निर्णयात भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी होते. 
ही चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. त्यात पन्नास टक्के जागांची मागणी भाजपकडून करण्यात आली असली तरी जास्त जागा शिवसेना लढविणार या अटीवर चर्चा सुरू असताना थेटच शिवसेना नेतृत्वाकडून राज्यातच युती तुटल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे सर्व चर्चा फिस्कटल्यातच जमा आहे. त्यामुळे आता सत्ता मिळविण्यासाठी काय करावे या विवंचनेत शिवसेनेचे नेते आहेत.

मागच्या काळात झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांत शिवसेनेला जिल्ह्यात चांगले दिवस पाहायला मिळाले होते. राणेंच्या विरोधी म्हणून जिल्ह्यातील लोकांनी लोकसभेत विनायक राऊत यांना, तर विधानसभेत दीपक केसरकर व वैभव नाईक यांना विजयी केले होते. त्यामुळे ऐन जोशात असलेल्या शिवसेनेची ताकद वाढण्याची परिस्थिती  निर्माण झालेली असताना शिवसेनेत गृहकलह वाढला. खासदार राऊत हे सचिव असल्यामुळे त्यांनी जिल्ह्यातील संघटना बांधण्याचे काम हातात घेतले; परंतु दरम्यानच्या काळात थेट केसरकर यांच्या वाट्याला राज्यमंत्री आणि पालकमंत्री अशी दोन पदे आल्यामुळे त्या दोघांत अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. आमदार नाईक यांच्यावर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी असल्यामुळे ते आपली टीम बनविण्याच्या तयारीत आहेत. या सर्व परिस्थितीत आपण संघटनेसाठी नाही, तर राज्यातून निधी आणण्यासाठी काम करणार आहोत, असे सांगणाऱ्या केसरकर यांनी आपल्या मतदारसंघात अन्य कोणी पक्षाच्या वरिष्ठांनी लुडबूड करू नये, असा दंडक थेट मातोश्रीवरून आणला. त्यामुळे अंतर्गत कलह उघड दिसू लागला.

पालिका निवडणुकीत याचा बऱ्यापैकी प्रत्यय आला. भाजप युतीसाठी प्रयत्न करीत असताना सावंतवाडी आणि वेंगुर्ले पालिकेवर असलेल्या वर्चस्वाला कोणताही धक्का लागणार नाही या अविर्भावात श्री. केसरकर यांनी शेवटपर्यंत युती करण्यास तयारी दर्शविली नाही. त्यामुळे भाजपकडून अंतिम टप्प्यात स्वबळावर निवडणुका लढविण्यात आल्या. त्याचा फायदा काँग्रेसला झाला. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत सुद्धा आता हीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

भाजपच्या नेत्यांची अडचण
युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असताना राज्यातून युती नको, असा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर शिवसेनेसह भाजपच्या नेत्यांची अडचण झाली आहे. त्याचा फायदा काँग्रेस घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता आपली बलस्थाने राखण्यासाठी शिवसेना यशस्वी ठरते का, हे मात्र प्रश्‍नचिन्ह आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com