IPL History Unlucky Cricketer : भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरूवातीपासूनच रणजी ट्रॉफीला एक मोठं वलय होतं. या रणजी ट्रॉफीच्या सामन्यातूनच भारतीय संघाला त्याचे भविष्यातील खेळाडू मिळायचे. मात्र 2008 पासून रणजी ट्रॉफीचं वलय हे आयपीएलने मिळवले. कालांतराने भारतीय संघात यायचं असेल तर आयपीएल हाच एक पर्याय अनेक खेळाडूंना वाटू लागला.
आयपीएलमध्ये चमकलेले अनेक तारे सध्या भारतीय संघात खेळत आहेत. आपले स्थान पक्के करत आहेत. मात्र प्रत्येकासाठी आयपीएल खेळून भारतीय संघाची दारे उघडलीच असे नाही. काहींनी एक हंगाम गाजवला.
मात्र त्यांचा पुढे कोणताच गाजावाजा झाला नाही. उलट ते काळाच्या पडद्यामागे कधी गेले हे कळालेच नाही. असेच एका हंगामानंतर त्यांची फारशी चर्चा न झालेले आयपीएल इतिहासातील 5 खेळाडू पाहणार आहोत.
स्वप्निल अस्नोडकर (राजस्थान रॉयल्स)
गोव्याचा क्रिकेटपटू स्वप्निल अस्नोडकर आयपीएलचा पहिला हंगाम राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. या हंगामात त्याने 9 सामन्यात 133.47 च्या स्ट्राईक रेटने एकूण 311 धावा केल्या होत्या. मात्र यानंतर त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्याची आयपीएल कारकीर्द कधी संपली हे कळालेच नाही.
पॉल वल्थाटी (पंजाब किंग्ज)
पॉल वल्थाडीने 2011 च्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत 63 चेंडूत 120 धावांची शतकी खेळी करत धमाका केला होता. पंजाबने सामना जिंकला आणि हा खेळाडू रातोरात स्टार झाला. या हंगामात वल्थाटीने 137 च्या स्ट्राईक रेटने 463 धावा केल्या होत्या. यात 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र यानंतर पॉलला पुढच्या हंगामात 6 तर त्याच्या पुढच्या हंगामात फक्त 1 सामना खेळण्याची संधी मिळाली. सध्या तो एअर इंडियामध्ये काम करतोय तर मुंबईत क्लब क्रिकेट खेळतोय.
कामरान खान (राजस्थान रॉयल्स)
उत्तर प्रदेशचा गोलंदाज कामरान खानने 2009 च्या हंगामात आयपीएल पदार्पण केले होते. त्याने त्यावेळी एकही फर्स्ट क्लास क्रिकेटचा सामना खेळला नव्हता. त्याने केकेआरविरूद्ध सामना जिंकून देणारे षटक टाकले होते. त्याने ख्रिस गेलची विकेट घेतली होती.
मात्र स्लिंग बॉलिंग अॅक्शन असलेला हा वेगवान गोलंदाज त्याच्या अॅक्शनमुळेच अडचणीत आला. त्याला त्याची अॅक्शन सुधारली मात्र त्याचा परिणाम त्याच्या गोलंदाजीवर झाला अन् त्याची कारकीर्दच संपुष्टात आली. त्याने आयपीएलमध्ये 11 सामने खेळत 12 विकेट्स घेतल्या.
राहुल शर्मा (पुणे वॉरियर्स)
राहुल शर्मा हा लेग स्पिनरचं नाव तुम्ही कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं का? हो हाच राहुल शर्मा आहे जो भारतीय संघाकडून खेळला होता. त्याने 2011 च्या आयपीएल हंगामात धुमाकूळ घातला होता. पुणे वॉरियर्सकडूण खेळणाऱ्या राहुलने 16 विकेट्स घेतल्या.
राहुल शर्मा सचिन तेंडुलकरला बाद करत चर्चेत आला होता. या कामगिरीच्या जोरावर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी देखील मिळाली. त्याने भारताकडून 4 वनडे तर 2 टी 20 सामने खेळले. मात्र तो 2012 च्या एका रेव पार्टी प्रकरणात अडकला आणि त्याची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली.
यो महेश (दिल्ली डेअरडेव्हिल्स)
यो महेश हा दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएलचा पहिला हंगाम खेळला होता. त्याने यावेळी 11 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र यानंतर त्याला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्यामुळे त्याच्या आयपीएल कारकिर्दीला ब्रेक लागला.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.