INDvsSA : तो प्रश्न आता बंद झालाय : अजिंक्य रहाणे

Ajinkya Rahane Says that no one asks me about century now
Ajinkya Rahane Says that no one asks me about century now

विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला अवघे दोन दिवस बाकी राहिले असताना विसाखापट्टणमला पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय संघ हल्ली सामन्याच्या दोन दिवस अगोदर जोरदार सराव करतो आणि सामन्याच्या आदल्या दिवशी हलका सराव करतो. त्याच जोरदार सरावाचे विचार मनात असताना सकाळी पावसाच्या सरींना बघत खेळाडूंना विसाखापट्टणम शहराचा पाहुणचार स्वीकारावा लागला. दुपारी बारा नंतर पावसाने विश्रांती घेतली प्रकाशही सुधारला आणि संपूर्ण तीन तास भारतीय संघाने मैदानावर सराव केला.

सरावाच्या सुरुवातीला रोहित शर्मा आणि मयांक अगरवालच्या साथीने कप्तान विराट कोहली फलंदाजी करू लागले. फिरकीच्या जाळ्यातील सरावात अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव गोलंदाजी करत होते. दुसर्‍या नेटमध्ये महंमद शमी आणि इशांत शर्मा वेगाने मारा करत होते. नंतरच्या काळात चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीनेही भरपूर वेळ फलंदाजीचा सराव केला.

सरावानंतर उप कप्तान अजिंक्य रहाणे पत्रकारांशी वार्तालाप करायला आला. येणारा काळ उत्साहाचा असेल ना, कारण शतकाचा दुष्काळ संपला आहे, पाच कसोटी सामने भारतीय संघ मायदेशात खेळणार आहे आणि गणपतीही जवळ आले आहेत (लवकरच अजिंक्य रहाणे बाप होणार आहे), असा प्रश्न ‘सकाळ’ने विचारला असता अजिंक्य रहाणे मनापासून हसला. ‘‘खूप उत्साहाचा आहे शंकाच नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेस्ट इंडिजमधल्या कसोटी सामन्यात माझे शतक झाले आणि ‘शंभर कधी करणार’ हा प्रश्न बंद झालाय ज्याने मला हायसे वाटत आहे. मला प्रत्येक सामन्याने खूप काही शिकवले आहे. असे बघ की पहिला कसोटी सामना खेळण्याअगोदर मी 17 कसोटी सामने संघात होतो मग मला पदार्पण करायची संधी लाभली. आत्ताही 17 कसोटी सामन्यांच्या प्रतीक्षेनंतर मला कसोटी शतक झळकावता आले. हँम्पशायरकडून कौंटी क्रिकेट खेळत असताना मी तोच विचार करत होतो की पदार्पणा अगोदर मला थांबावे लागले पण माझे विचार सकारात्मक होते. मी खेळाचा आनंद घेत होतो. नेमके गेल्या 17 कसोटीत काय होत होते की मी चांगली फलंदाजी करत होतो पण सतत शतक कधी होणार याचा विचार करत होतो. आणि शतक माझ्यापासून लांब जात होते. वेस्ट इंडिजमध्ये फलंदाजीला जाताना मी शतकाचा विचार मागे टाकला आणि संघ काय अवस्थेत आहे त्याचा विचार करून फलंदाजीचा आनंद घ्यायला लागलो. मजा बघ मी संघाला गरज असताना चांगली फलंदाजी केली आणि शतकही झाले’’, अजिंक्य रहाणे मनापासून बोलला.

भारतात कसोटी सामने होणार असल्याबद्दल बोलताना रहाणे म्हणाला, ‘‘आयसीसीने टेस्ट चँम्पीयनशिप जाहीर केल्यापासून कसोटी सामन्यांची धार वाढली आहे. कोणी कोणाला कमी लेखत नाही. प्रत्येक सामन्यातील विजयाला मोल आहे कारण कसोटी सामना गमावला किंवा अगदी अनिर्णित राहिला तरी विजयाच्या गुणात आणि त्यात फरक मोठा आहे. म्हणून आम्हांला प्रत्येक सामना चांगले क्रिकेट खेळून जिंकायचा आहे’’.

PAKvsSL : पाकिस्तानच्या अख्ख्या टीमचे मायदेशात पदार्पण

बाप होण्याची वेळही जवळ येत आहे त्या बद्दल काहीसे लाजत बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला, ‘‘एक नवा अध्याय माझ्या जीवनात चालू होणार आहे लवकरच त्याची उत्सुकता मोठी आणि पण सध्या लक्ष कसोटी सामन्यावर केंद्रित करतो आहे’’.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com