मुंबई : महाराष्ट्राच्या अल्फिया पठाण हिने आशियाई बॉक्सिंग कुमारी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर राज्यातील शर्वरी कल्याणकर हिने रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताने या स्पर्धेत सहा सुवर्णपदकांसह 23 पदके जिंकली.
आशियात प्रथमच झालेल्या या स्पर्धेत भारताने सर्वांगीण विजेतेपद पटकावले. त्यातही मुलींनी लक्षणीय कामगिरी केली. मुलींनी 4 सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन ब्रॉंझ जिंकताना मुलांच्या संघापेक्षा (2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 ब्रॉंझ) जिंकली. मुलींच्या संघातील अल्फियासह तनिशबीर कौर संधू (60 किलो), कल्पना (60 किलो) तसेच तनिशबीर कौर (80 किलो) यांनी सुवर्णपदक जिंकले. मुलांच्या स्पर्धेत सुरेश विश्वनाथ (46 किलो) आणि बिश्वमित्र चोंगथाम (48 किलो) यांनी अव्वल क्रमांक मिळवला.
नागपूरच्या अल्फियाने 80 किलोपेक्षा जास्त गटाच्या लढतीत कझाकस्तानच्या डायना मॅगायुयेवा हिला हरवले. मूळची बॅडमिंटनची गोडी असलेली अल्फिया भाऊ बॉक्सिंग खेळताना बघत असे. त्यावेळी तेथील मार्गदर्शक गणेश पुरोहित यांनी तिला बॉक्सिंगबाबत विचारले आणि काही दिवसांत तिला खेळाची गोडी लागली. तिने तीन वर्षांत आशियाई पदक जिंकले.
पंधरा वर्षीय शर्वरी आशियाई स्पर्धेत पदक जिंकलेली मराठवाड्यातील पहिली बॉक्सर असल्याचे औरंगाबाद जिल्हा संघटनेचे सचिव पंकज बाहरसाखले यांनी सांगितले. तिला 70 किलो गटाच्या अंतिम लढतीत कझाकस्तानच्या वालेरिया हिच्याविरुद्ध 0-5 हार पत्करावी लागली. औरंगाबादच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणात शर्वरीस सन्नी गेहलावात यांचे मार्गदर्शन लाभते.
|