मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न साकारले. आता ऑलिंपिक पदक जिंकणे हेच केवळ शिल्लक आहे. त्यावरच सर्व लक्ष केंद्रित केले आहे, असे राही सरनोबतने सांगितले. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेली पहिली महिला नेमबाज, असा मान राहीने मिळवला आहे.
दुखापतीमुळे दीर्घ ब्रेक घेणे भाग पडलेल्या राहीने यंदाच खऱ्या अर्थाने पदकाचा वेध घेण्यास पुन्हा सुरुवात केली आणि एशियाडमध्ये सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केला. "ऑलिंपिकमधील पदकच केवळ मी जिंकलेले नाही. त्यामुळे अर्थातच 2020 ऑलिंपिक हेच माझे लक्ष्य आहे. यापूर्वीही मी ऑलिंपिकसाठी पात्र ठरले आहे, पण तो आता इतिहास झाला आहे. टोकियोत आता पदक जिंकायचे आहे,' असे राहीने सांगितले.
ऑलिंपिकपूर्वी खूप गोष्टींत सुधारणा करण्याची गरज आहे. ही स्पर्धा कधीच सोपी नसते. त्या वेळी खूप वेगळ्याच प्रकारचे दडपण असते. त्या स्पर्धेच्या वेळी शारीरिकच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही कणखर असणे आवश्यक असते. सर्वच भारतीय नेमबाज तांत्रिकदृष्ट्या चांगले आहेत. आता आम्हाला शारीरिक, तसेच मानसिक तंदुरुस्तीकडे लक्ष केंद्रित करायचे आहे, असेही तिने सांगितले.
ऑलिंपिकला अजून दोन वर्षे आहेत, त्यामुळे पाच ऑलिंपिक पात्रता स्पर्धा आहेत. या सर्वच स्पर्धांत कस पणास लागेल. या स्पर्धा आम्ही नेमके कुठे आहोत हे दाखवतील, असे राहीने सांगितले. आज क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी राहीचा गौरव केला. त्या वेळी त्यांनी ऑलिंपिक तयारीसाठी राहीला साह्य करण्याचे आश्वासन दिले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.