नवी दिल्ली : आम्ही केंद्र सरकारच्या धोरणाशी नव्हे, तर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक चळवळीशी बांधील आहोत, असे सांगत भारतीय टेनिस संघटनेचे पदाधिकारी भारतीय संघ पाकिस्तानातील डेव्हिस करंडक लढत खेळणार असल्याचे सांगत होते, पण आता केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयानंतर संघटनेस उपरती आली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस करंडक जागतिक गट पात्रता लढत इस्लामाबादला 14 आणि 15 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने इस्लामाबादमधील लढतीच्या सुरक्षेबाबत कोणताही प्रश्न नाही, असे सांगितल्यावर भारतीय टेनिस संघटनेने केंद्र सरकारची परवानगीही न घेता आम्ही तिथे खेळणार आहोत हे सांगितले. एवढेच नव्हे तर दौऱ्यास केंद्राची मंजुरी नसतानाही संघही जाहीर केला.
पाकिस्तान सरकारने भारताबरोबरील संबंध कमी करण्याचे ठरवल्यावर भारतीय टेनिस संघटनेस तिथे खेळणे आता असुरक्षित वाटू लागले आहे. काश्मीरमुळे दोन्ही देशांतील परिस्थिती खूपच संवेदनशील झाली आहे. या परिस्थितीत पाकिस्तानात खेळणे कितपत सुरक्षित असेल हाही प्रश्न आहे, असे मत भारतीय टेनिस संघटनेचे सचिव हिरोण्मय चटर्जी यांनी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
आम्ही पाकिस्तानात खेळणार नाही असे कधीही म्हणणार नाही. ही टिप्पणी केल्यास आम्हाला दंड होईल, तसेच आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या कारवाईस सामोरे जावे लागेल. आम्ही काही दिवस परिस्थितीचा आढावा घेणार आहोत असे त्यांनी सांगितले. भारत-पाक लढत त्रयस्थ ठिकाणी खेळवणे योग्य होईल. पाकिस्तान यापूर्वीही त्रयस्थ ठिकाणी खेळले आहेत. दोन्ही संघांना सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी लढत होऊ शकेल, असेही ते म्हणाले.
पाकिस्तानने लढत खेळण्यासाठी आवश्यक असलेले निमंत्रणपत्र पाठवले आहे. भारतीय संघातील सदस्यांनी व्हिसासाठी अर्जही केला आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानात जाण्याबाबत फेरविचारही करीत आहोत. आम्हीही सतत परिस्थितीचा आढावा घेत आहोत.
- हिरोण्मय चटर्जी, भारतीय टेनिस संघटनेचे सचिव
|