मुंबई : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्यावेळी निवड समिती सदस्य अनुष्का शर्मास चहा देत होते, या वक्तव्याचा अनुष्काने चांगलाच समाचार घेतला. निवड समिती सदस्य आणि आपण वेगळ्या कक्षात होतो, असे सांगताना मी फक्त कॉफी पिते असे सांगून जोरदार टोला दिला आहे.
इंजिनियर यांच्या टिकेच्या निमित्ताने अनुष्काने उत्तर दिले असले तरी भारतीय संघच नव्हे, तर विराट कोहलीच्या खराब कामगिरीसाठीही आपल्याला निष्कारण जबाबदार धरले, तरीही आपण शांत बसलो होतो. मात्र, सतत खोटे सांगितले जात असल्यामुळे आपण अखेर उत्तर देत असल्याचे सांगितले आहे.
विश्वकरंडक स्पर्धेच्यावेळी निवड समिती सदस्य मला चहा देत होते, हाही अनेक खोट्या आरोपांपैकी एक आहे. मी केवळ स्पर्धेतील एका लढतीस गेले होते. त्यावेळी फॅमिली बॉक्समध्ये होते, निवड समिती सदस्य असलेल्या कक्षात नव्हे. तुम्हाला निवड समिती सदस्यांना लक्ष्य करायचे असेल तर करा; पण आपल्या मुद्द्याला बळकटी देण्यासाठी माझे नाव कशाला घेता. मला हे मान्य नाही, असे अनुष्काने म्हटले आहे.
भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यात उच्चायुक्तांना भेटायला गेला होता. त्यावेळी संघाच्या छायाचित्रात अनुष्का असल्याने टीका झाली होती. आता यासही अनुष्काने उत्तर दिले. ती म्हणाली. उच्चायुक्तांच्या पत्नीने मला संघासोबतच्या छायाचित्रासाठी उभे राहण्याचा आग्रह केला. मी त्यास तयार नव्हते. तरीही त्या छायाचित्रावरून निष्कारण वादळ निर्माण करण्यात आले. त्यावेळी मला कार्यक्रमाचे निमंत्रण असल्याचे भारतीय मंडळाने सांगितल्यामुळे मी त्यावेळी शांत राहिले होते.
अनुष्काची चीड
- भारतीय संघाच्या पराभवासाठी तसेच विराट कोहलीच्या अपयशासाठी मलाच जबाबदार धरले जाते
- आमचे एकमेकांवर प्रेम असल्याचे समजल्यापासून हे सुरू आहे
- भारतीय क्रिकेट मंडळच माझ्या तिकीट, सुरक्षेकडे लक्ष देते असे चित्र
- ज्या सामन्यास उपस्थित राहिले त्याचे तिकीट काढले, त्यासाठी खर्चही मीच केला होता, तरीही मी गप्प बसले
|