मुंबई : आशियाई तिरंदाजी स्पर्धेत अतानू दासने रिकर्व्हच्या एकेरीत ब्रॉंझ पदक जिंकले. वैयक्तिक स्पर्धेत अपयशी ठरल्यावर भारतीय तिरंदाजांनी सांघिक स्पर्धेत पदकाचा वेध घेतला.
बॅंकॉकला सुरु असलेल्या या स्पर्धेत अतानूने ब्रॉंझ पदकाच्या लढतीत कोरियाच्या जिन हायेक ओह याचा 6-5 असा पाडाव केला. अतानू त्यापूर्वी उपांत्य लढतीत कोरियाच्या जिन हब्याक ओह याच्याविरुद्ध टायब्रेकरवर 5-6 असा पराजित झाला होता. जागतिक संघटनेच्या ध्वजाखाली भारतीय तिरंदाज या स्पर्धेत खेळत आहेत. ऑलिंपिक पात्रता स्पर्धेपूर्वी ही स्पर्धा होत आहे.
मिश्र दुहेरीतही ब्रॉंझ जिंकलेल्या अतानूने जयंत तालुकदार आणि तरुणदीप रायच्या साथीत रिकर्व्हचे सांघिक ब्रॉंझ भारतास जिंकून दिले. त्यांनी चीनचा 6-2 असा पराभव केला. अतानूसह मिश्र दुहेरीत ब्रॉंझ जिंकलेल्या दीपिका कुमारीने लैशराम बॉम्बयला देवी आणि अंकिता भकत याच्या साथीत सांघिक ब्रॉंझ जिंकले. त्यांनी जपानचे आव्हान 5-1 असे परतवले. त्यापूर्वी त्यांना कोरियाविरुद्ध हार पत्करावी लागली होती.
ऑलिंपिक प्रकार नसलेल्या कम्पाऊंडच्या सांघिक स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली. अभिषेक वर्मा, रजत चौहान आणि मोहन भारद्वाजने भारतास इराणविरुद्ध 229-221 असे विजयी केले. अव्वल मानांकित भारतासमोर कोरियाचे आव्हान असेल. ज्योती सुरेखा, मुस्कान किरार आणि प्रिया गुर्जर यांनी भारतीय महिला संघास इराणविरुद्ध 227-221 असे विजयी केले. त्यांच्यासमोरही कोरियाचेच आव्हान असेल. कम्पाऊंडच्या मिश्र दुरीेत ज्योती - अभिषेकने यापूर्वीच अंतिम फेरी गाठली आहे.
|