मुंबई : पी. व्ही. सिंधू भारताचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार या अपेक्षेनेच जागतिक बॅडमिंटन स्पर्धेकडे लक्ष देतील, पण चिराग शेट्टी-सात्विक साईराजच्या दुहेरीतील माघारीचा त्यापूर्वीच भारतास हादरा बसला आहे.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धा उद्यापासून सुरू होईल. सिंधूला गेल्या दोन स्पर्धांत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. कॅरोलिना मरीनच्या अनुपस्थितीत सिंधू बाजी मारेल अशी अपेक्षा बाळगली जात आहे. सिंधू, साईना महिला एकेरीत किदांबी श्रीकांत पुरुष एकेरीत आशा असताना चिराग-सात्विककडून दुहेरीत आशा बाळगल्या जात होत्या, पण या दोघांनी सात्विकच्या दुखापतीमुळे माघार घेतली.
थायलंड ओपन जिंकून सात्विक-चिरागने जागतिक दुहेरी क्रमवारीत अव्वल 10 मध्ये स्थान मिळवले होते, पण हीच स्पर्धा जिंकताना सात्विकचा खांदा दुखावला होता; तर चिरागचा स्नायू दुखावला आहे. दोघेही पूर्ण तंदुरुस्त नसल्यामुळे त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली. जागतिक स्पर्धेत खेळल्यास दुखापत अधिक गंभीर होईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. सप्टेबरमधील चायना ओपनद्वारे सात्विक-चिराग पुनरागमन करतील.
दरम्यान, साईना आणि सिंधूचा मार्ग सोपा नाही. पहिल्या फेरीत बाय असलेल्या साईनाला दुसऱ्या फेरीत चौथ्या मानांकित चेन युएफेई हिचे आव्हान असू शकेल. साईनाने चेनविरुद्धच्या गेल्या दोन लढती गमावल्या आहेत. सिंधूसमोर उपांत्यपूर्व फेरीत तई झु यिंग हिचे आव्हान असेल.
|