कोलंबो - श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत (लंच) भारताने सहा गडी गमावित 451 धावांपर्यंत मजल मारली.
पहिल्या दिवशी नाबाद राहिलेले शतकवीर चेतेश्वर पुजारा (133 धावा - 232 चेंडू) व अजिंक्य रहाणे (132 धावा - 222 चेंडू) हे दोघेही आज त्यांच्या वैयक्तिक धावसंख्येत फारशी भर न घालता बाद झाले. मात्र यानंतर आलेल्या रवीचंद्रन आश्विन (54 धावा -92 चेंडू) याने पाच चौकार व एक षटकाराच्या सहाय्याने झळकाविलेले अर्धशतक आजच्या भारतीय फलंदाजीचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. आश्विन याला वृद्धिमान साहा याने नाबाद 21 धावा करत पूरक साथ दिली.
आक्रमक खेळू लागलेल्या आश्विन याला फिरकीपटू रंगना हेरथ याने त्रिफळाबाद केले. अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्या (0 धावा - 2 चेंडू) हा आता साहा याच्याबरोबर खेळावयास आला आहे.
गॉल येथील पहिल्या सामन्यात भारताने पहिल्या डावात ६०० धावांचा डोंगर उभा केला आणि त्यासमोर श्रीलंकेचे आव्हान खुजे ठरवले होते. या सामन्यातही भारताकडून पहिल्या डावात भक्कम धावसंख्या उभारण्यात आल्यामुळे श्रीलंकेवरील दडपण अधिक वाढल्याचे मानले जात आहे.
|