Day one reports of india against bangladesh in 1st test
Day one reports of india against bangladesh in 1st test

INDvsBAN : प्रतिस्पर्धी कोणीही असो हुकूमत फक्त भारतीय वेगवान गोलंदाजांचीच!

इंदूर : होळकर मैदानावरील खेळपट्टीने दिलेल्या थोड्या साथीचा पुरेपूर फायदा घेत भारतीय वेगवान गोलंदाजांनी बांगलादेश संघाची भंबेरी उडवली. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून मोमीनुलने प्रथम फलंदाजी करायचा धाडसी निर्णय घेतला जो पाहुण्या संघाच्या चांगलाच अंगलटी आला. महंमद शमी (3 बळी) उमेश यादव आणि ईशांत शर्माने मिळून बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवर गुंडाळला. उरलेल्या 26 षटकांच्या खेळात भारतीय फलंदाजांनी 1 बाद 86 ची मजल मारून पहिल्याच दिवशी सामन्यावर वर्चस्व गाजवायच्या दिशेने वाटचाल चालू केली.

भारतीय फलंदाजीचा धसका घेऊन बांगलादेश कप्तान मोमीनुलने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करायचा धाडसी निर्णय घेतला. खेळपट्टीचा अंदाज घेता अपेक्षेप्रमाणे भारतीय संघात ईशांत शर्माला स्थान दिले गेले. बांगलादेशी फलंदाजांना पहिली धाव फलकावर लावायला 20 चेंडू खेळावे लागले इतका ईशांत शर्मा - उमेश यादवने शिस्तपूर्ण मारा केला. सलामीची जोडी शादमन इस्लाम आणि इमरूल कयासला बाद करायला जास्त मेहनत करावी लागली नाही. कप्तान मोमीनुल हक आणि मुश्फीकूर रहीमने डगमगता डाव थोडा सावरला. दोघेही नशीबवान ठरले जेव्हा विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे सारख्या निष्णात क्षेत्ररक्षकांनी झेल सोडले.


उपाहारानंतर अश्विनच्या चेंडूचा अंदाज घेताना मोमीनुल हक साफ चुकला आणि त्याची उजवी स्टंप हलली. नशीब साथ देणार्‍या मुश्फीकूरने अनुभव पणाला लावत खेळपट्टीवर उभे राहण्याचा संयम दाखवला. दुसरा अनुभवी फलंदाज मेहमदुल्लाने मात्र अश्विनला आततायी फटका मारायच्या नादात विकेट गमावली. दुसर्‍या टप्प्यात गोलंदाजीला आलेल्या महंमद शमीने पहिल्यांदा मुश्फीकूर रहीमला (43 धावा) बोल्ड केले आणि पुढच्याच चेंडूवर मेहदी मीराजला पायचित केले. चहापानाला 7 बाद 140 धावांवर बांगलादेशचा संघ अडखळताना दिसला.  

अखेर एमएसके प्रसादांची होणार हकालपट्टी; 'हा' माजी खेळाडू होणार निवड समितीची अध्यक्ष

चहापानानंतरच्या पहिल्याच चेंडूवर ईशांत शर्माने शेवटचा चांगला फलंदाज लीटन दासला बाद केले. 5 बाद 140 धावसंख्येवरून पुढचे 5 फलंदाज 10 धावांमधे तंबूत परतल्याने बांगलादेशी संघाची दाणादाण उडाली. पहिला डाव बघता बघता 150 धावांवर आटोपला. महंमद शमीने तीन तर अश्विन, उमेश यादव आणि ईशांत शर्मा प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

उरलेल्या वेळेत भारतीय फलंदाजांनी हात धुऊन घेतले. रोहित शर्मा फक्त 6 धावा करून अबू जायेदला बाद झाल्यावर मयांक आगरवाल आणि चेतेश्वर पुजाराने भारताला 1 बाद 86 ची धावसंख्या सहजी गाठून दिली. चेतेश्वर पुजाराने आक्रमक खेळ करताना टकाटक 7 चौकार मारले. खेळ संपण्याअगोदर इमरूल कयासने मयांक आगरवालचा अत्यंत सोपा झेल सोडून संघाला अडचणीत टाकले. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा पुजारा 43 तर मयांक आगरवाल 37 धावांवर नाबाद परतले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com