मुंबई : उपनगर जिल्हा क्रीडा स्पर्धेअंतर्गत सुरू असलेल्या ऍथलेटिक्स स्पर्धा शर्यतीच्या वेळी शंभर मीटर शर्यतीतील स्पर्धक थाळीफेक स्पर्धेतील थाळी लागून जखमी झाली आणि आता झोहा मन्सूरीला आपल्याला क्रिकेट सामन्यांना त्यामुळे मुकावे लागणार अशी धास्ती वाटत आहे.
या स्पर्धेच्या वेळी कोणतीही वैद्यकीय प्राथमिक सुविधा नव्हती. त्यातच कांदिवलीतील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रात खासगी वाहनांना प्रवेश नसतो. त्यामुळे झोहाच्या आईने आपल्या मुलीला अन्य पालकांच्या मदतीने नजीकच्या रुग्णालयात नेले. डोक्याला लागलेल्या थाळीने झोहाच्या डोक्याला दुखापत झाली. दोन किलो वजनाची थाळी वेगाने लागूनही सुदैवाने कमालीची गंभीर दुखापत झाली नाही. मात्र मैदानावर नसलेली प्रथमोपचार पेटी; तसेच बर्फाची उणीव याबाबत पालक नाराज आहेत.
झोहाचे आम्ही सिटीस्कॅन केले, त्यात अंतर्गत दुखापत झाल्याचे आढळले नाही; पण जे काही घडले, त्याचा धक्का अजूनही जाणवत आहे. किमान माफक सुविधा तरी हव्यात, खेळाडूंची त्यांना काळजीच नसावी असे वाटते, असे झोहाची आई तरन्नुम हिने सांगितले. धावण्याच्या आणि थाळीफेकीची स्पर्धा घेणाऱ्या अधिकाऱ्यात समन्वय असता तर ही दुर्घटना टळली असती. याबाबत उपनगर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी, असे मत ऍथलेटिक्स मार्गदर्शकांनी व्यक्त केले. या दुर्घटनेने नक्कीच आम्हाला शिकवले आहे. आगामी स्पर्धेच्या वेळी नक्कीच डॉक्टर असतील, असे उपनगरच्या अधिकारी जयश्री देवकर यांनी सांगितले.
झोहा आता चांगली आहे. तिला दुखापतीपासून आपण क्रिकेट लढतीस मुकणार, असेच सतत वाटत होते. खरं तर तिची क्रिकेट लढत आज (सोमवारी) होणार होती; पण पावसामुळे ही लढत लांबली आहे. आपण या लढतीस मुकणार, असेच ती सतत सांगत होती. पहिल्यांदाच ती या गोष्टीबाबत धास्तावली आहे. ती काही कशाला घाबरणारी मुलगी नाही, सिझन चेंडूलाही बिनधास्त खेळली होती, असेही तरन्नुम यांनी सांगितले.
|