अवघ्या काही दिवसांवर आलेल्या प्रकाशझोतातील ऐतिहासिक कसोटी सामन्याची उत्कंठा फारच वाढू लागली आहे. भारत तसेच बांगलादेश प्रथमच प्रकाशझोतात कसोटी खेळणार असल्यामुळे सराव तर सुरु झालेला आहे, पण सराव आणि प्रत्यक्ष सामना यामध्ये मोठा फरक असतो. सूर्यप्रकाशात, संधीप्रकाशात आणि अगदी प्रकाशझोतात तिन्ही वेगवेगळ्या वेळांमध्ये प्रामुख्याने फलंदाज नेटमध्ये कसून सराव करत आहेत. पाहायला गेल तर सर्व लक्ष फलंदाजांवर केंद्रीत झालेले आहे, ते स्वाभाविकही आहे. गोलंदाजांना काय प्रकाश कसाही असला तरी टप्पा आणि दिशा तोच कायम ठेवायचा आहे. तरिही गोलंदाजीची आपली नेमकी रचना कशी असावी यासाठी विचार विनियम सुरु झालेला आहे.
फॉर्मनव्हे तर परिस्थितीनुसार संघ निवड
प्रतिस्पर्धी, खेळपट्टी आणि हवामान यानुसार संघ रचना केली जाते एवढेच नव्हे तर समोरच्या संघात डावे-उजवे किती फलंदाज आहेत त्यानुसार आपलेही डावे-उजवे गोलंदाज निवडले जातात. एवढा बारकाईने विचार होत असतो त्यामुळे प्रकाशझोतातील सामन्यासाठी फॉर्म नव्हे तर कोणता गोलंदाज आणि तो का यशस्वी होईल याचा विचार केला जाणार.
ईडन गार्डनच्या खेळपट्टीवर गवत असणार, गुलाबी चेंडूवरची लकाकी अधिक ठेवण्यात आलेली आहे तसेच सायंकाळी हा चेंडू अधिक स्वींग होणार असल्याचा अंदाज असल्यामुळे महम्मद शमी, ईशात शर्मा आणि उमेश यादव हे वेगवान गोलंदाज अंतिम संघात असणार हे निश्चित आहे. सध्या भारतीय संघ रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन अशा दोन फिरकी गोलंदाजांसह खेळत आहे. त्यात जडेजा फलंदाजीतही उपयुक्त ठरत आहे तर अश्विन गोलंदाजीत आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत आहे.
चेंडूची शिवण ठरणार निर्णायक
पण कोलकातामध्ये दोन फिरकी गोलंदाज खेळवले जाण्याची आणि तेही जडेजा- अश्विन जोडीला एकत्रित संधी मिळणयाची शक्यता कमी आहे. याचे कारण असेल तो एसजी बनावटीचा गुलाबी चेंडू ! या सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या गुलाबी चेंडूची शिवण काळ्या जाड धाग्याची आहे. साधाणतः लेगस्पिन आणि चायनामन गोलंदाजांनी नेमका कोणता चेंडू टाकला या अंदाज समोरचा फलंदाज त्याच्या मनगटावरून बांधतो नाहीतर शिवण कोणत्या दिशेला आहे यावर तो चेंडू कोणत्या दिशेला वळणार हे ठरवतो आणि त्यानुसार खेळतो पण क्रास सिमने (चेंडू आडवा धरून) जर चेंडू टाकला तर शिवण नेमकी कोणत्या बाजुला आहे हे ओळखणे कठिण जाईल. आपला चायनमन कुलदीप यादव अशा परिस्थितीत फारच धोकादायक ठरू शकतो. मुळात बांगलादेशच्या फलंदाजांनी कुलदीपचा सामना केलेला नाही.
कुलदीपला अधिक पसंती
जडेजा- अश्विनऐवजी कुलदीपला संधी द्यावी असे हरभजन सिंग म्हणतोय. एवढेच नव्हे तर दुलीप ट्रॉफीचे काही सामने या अगोदर प्रकाशझोतात आणि गुलाबी चेंडूवर खेळवण्यात आले होते त्यावेळी कुलदीपचे चेंडू ओळखणे कठिण जात होते असे मत गौतम गंभीरने मांडलेले आहे त्यामुळे जडेजा-अश्विनऐवजी कुलदीपला पसंती अधिक मिळू शकते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.