'डीआरएस'मधील पायचीतच्या निर्णयात बदल

'डीआरएस'मधील पायचीतच्या निर्णयात बदल

एडिनबर्ग - पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्यात येणाऱ्या (डीआरएस) नियमातील पायचीतच्या निर्णयाबाबत आयसीसीने महत्त्वाचा बदल केला आहे. हा नियम गोलंदाजांच्या पथ्यावर पडेल. आयसीसीच्या प्रशासकीय समितीची वार्षिक बैठक येथे पार पडली. त्यामध्ये पायचीतच्या या नव्या नियमासह काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कसोटी आणि एकदिवसीय लीग दोन श्रेणीमध्ये खेळण्याचा विचार लांबणीवर टाकण्यात आला. क्रिकेटचा प्रसार करताना सौदी अरेबियाला सहयोगी सदस्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.

क्रिकेट हा फलंदाजांना प्राधान्य देणारा खेळ होत असल्याने गोलंदाजांना अधिक संधी मिळावी म्हणून डीआरएसमधील पायचीतच्या निर्णयात करण्यात आलेला बदल गोलंदाजांना समान संधी देणारा ठरेल. पायचीतचे अपील मैदानावरील पंचांनी फेटाळले की, तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात येते. हा तिसरा पंच फलंदाज बाद ठरवण्यासाठी आतापर्यंतच्या नियमानुसार चेंडूचा अर्धा भाग यष्टींच्या (उजवी आणि डावी) सरळ रेषेच्या मध्यावर असणे आवश्‍यक होते; तसेच टप्पा पडल्यानंतर चेंडू डाव्या किंवा उजव्या यष्टींच्या अर्ध्या भागावर लावणे गरजेचे होते; पण आता चेंडूचा अर्धा भाग उजव्या किंवा डाव्या यष्टीच्या रेषेच्या बाहेर असला तरी फलंदाज बाद असेल तसेच टप्पा पडल्यानंतर चेंडूचा अर्धा भाग यष्टीला लागत असेल तरी फलंदाज बाद असेल. हा नियम 1 ऑक्‍टोबरपासून अमलात येणार आहे.

भारतासाठी बिनकामाचा नियम
शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासन समितीने डीआरएसमधील पायचीतच्या नियमात हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असला तरी, तो भारतासाठी बिनकामाचा आहे. बीसीसीआयचा मुळात डीआरएसला विरोध आहे, त्यामुळे त्यातील नियमातील बदलाचा भारतासाठी प्रश्‍नच येत नाही. मनोहर यांच्यासह अनेक भारतीय प्रशासकांचा डीआरएसला विरोध आहे.

नो बॉलबाबत ठाम असण्यासाठी कधी-कधी स्क्‍वेअर लेगच्या पंचांची मदत घेतली जाते; पण आता यासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेण्याची मुभा देण्यात आली आहे. टीव्ही पंच काही सेकंदांतच नोबॉलचा निर्णय देईल.

कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन श्रेणी करण्याचा विचार केला जात होता. एजबस्टनमधील या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत होती; परंतु मनोहर यांच्या समितीने हा प्रस्ताव लांबणीवर टाकला. याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत मांडण्यात आले.

राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेट?
डर्बन येथे 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यासाठी आयसीसी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी अर्जही दाखल करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com